आता मुंबई विद्यापीठ ‘गॅस’वर; चुलीवर जेवण, आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या थाळीतील पदार्थ घटणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 05:59 IST2026-03-14T05:59:17+5:302026-03-14T05:59:39+5:30
इराण आणि इस्त्राईल-अमेरिका युद्धाच्या तणावातून निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे मुंबई विद्यापीठाच्या हॉस्टेलमधील खानावळीत चुलीवर जेवण बनविण्याची वेळ आली आहे.

आता मुंबई विद्यापीठ ‘गॅस’वर; चुलीवर जेवण, आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या थाळीतील पदार्थ घटणार
मुंबई : इराण आणि इस्त्राईल-अमेरिका युद्धाच्या तणावातून निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे मुंबई विद्यापीठाच्या हॉस्टेलमधील खानावळीत चुलीवर जेवण बनविण्याची वेळ आली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना केवळ व्हेज बिर्याणी अथवा दालखिचडीच दिली जात आहे. त्याचबरोबर आयआयटी मुंबईच्या हॉस्टेलमधील खानावळीत विद्यार्थ्यांच्या थाळीतील खाद्यपदार्थांची संख्या कमी करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या कर्मवीर भाऊराव पाटील मुलांच्या वसतिगृहात मेसमध्ये खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी व्यावसायिक सिलिंडरचा वापर होत होता. मात्र सिलिंडर गुरुवारीच संपला. त्यामुळे चुलीवर जेवण बनविण्याची वेळ खानावळ चालकावर आली. कोळसा आणून चूल पेटवली जात आहे. चुलीवर संपूर्ण स्वयंपाक शक्य नसल्याने, तसेच मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चपाती बनविणे अवघड बनले आहे.
आयआयटी मुंबईवरही संकट; शाकाहारी थाळीच मिळणार
आयआयटी मुंबईमध्येही विद्यार्थ्यांच्या थाळीतील खाद्यपदार्थांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयआयटी मुंबईतील मेस प्रतिनिधीने विद्यार्थ्यांना शुक्रवारी याबाबतचे ई-मेल पाठविले असून शनिवारी, १४ मार्चपासून हे बदल लागू केले जाणार असल्याचे कळविले.
मांसाहारीसाठी अधिक उर्जा खर्ची पडत असल्याने शाकाहारी थाळीच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाष्ट्यामध्ये उकडलेल्या डाळी दिल्या जाणार नाहीत. तसेच दुपारी व सायंकाळच्या जेवणात केवळ एकच भाजी दिली जाईल, असे विद्यार्थ्यांना कळविण्यात आले.