अतिवृष्टीमुळे मुंबई, ठाण्याचा वेग मंदावला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 03:32 AM2019-08-04T03:32:37+5:302019-08-04T03:32:49+5:30

रेल्वे सेवा ठप्प; खारघर, ठाण्यातील विविध घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू

Mumbai, Thane slow down due to heavy rains | अतिवृष्टीमुळे मुंबई, ठाण्याचा वेग मंदावला

अतिवृष्टीमुळे मुंबई, ठाण्याचा वेग मंदावला

Next

मुंबई : कोसळधारा, सोसाट्याचा वारा, मिठी नदीची वाढती पातळी, सखल भागात साचलेल्या पाण्याच्या वाहत्या व वाढत्या लाटा, पावसाचे टपोरे थेंब, समुद्राला आलेली भरती आणि अधूनमधून झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबापुरीचा वेग मंदावल्याने मुंबईकरांना पुन्हा एकदा धडकी भरली. २६ जुलैसारखीच परिस्थिती पुन्हा उद्भवते की काय, अशी भीती मुंबईकरांना वाटू लागली असतानाच, दुपारनंतर पावसाचा वेग कमी झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला. मात्र, सकाळपासूनच कोलमडलेले रस्ते, रेल्वेसेवा यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास शनिवारची रात्री उजाडली. दरम्यान, ठाणे आणि नवी मुंबईत विविध घटनांमध्ये एकूण आठ जणांचा मृत्यू झाला.

रविवारीही रेड अलर्ट कायम
भारतीय हवामान शास्त्र विभागाने रविवारीही ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांचा रेड अलर्ट कायम ठेवला आहे. रविवारी या तिन्ही जिल्ह्यांत अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबईत मात्र मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. याव्यतिरिक्त नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यातही अतिवृष्टी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

४ ऑगस्ट रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ५ ऑगस्ट रोजी कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.

समुद्राने फेकला कचरा । या वर्षातील सर्वांत मोठी भरती शनिवारी आली. या वेळी ४.९ मीटर उंच लाटा समुद्रकिनाऱ्यांवर येऊन धडकत होत्या. त्यासोबतच कचºयाचा ढीगही किनाºयावर आला. एका दिवसात पाच चौपाट्यांवरून १८८ मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला.

पालघरमध्ये सर्वाधिक पाऊस । पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पालघरमध्ये सर्वाधिक म्हणजे २४० मिलीमीटर पाऊस पडला आहे. नदी, नाले, खाड्या ओसंडून वाहत असल्याने वाहतूक ठप्प पडली होती. शनिवारी दुपारी १ वाजता सूर्या प्रकल्पाच्या धामणी व कवडास या दोन धरणांतून ४२ हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

पाच तासांनी सीएसएमटी ते वाशी सेवा सुरू
हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते कुर्ला स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल लोकल सेवा दुपारी २.४५ ठप्प झाली होती. त्याचवेळी कुर्ला स्थानकादरम्यान सिग्नल बिघाड, चेंबूर ते टिळकनगरदरम्यान पुलाचा स्लॅब कोसळल्याने लोकल सेवा बंद झाली. तब्बल पाच तासांनी हार्बर मार्गावरून ७.४५ वाजता सीएसएमटी ते वाशी लोकलसेवा सुरू झाली.

साडेतीन तास मध्य रेल्वे ठप्प
मिठी नदी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्याने व शनिवारी दुपारी समुद्रास मोठी भरती आल्याने, लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला, सायनसह येथील रेल्वे रुळांवर पाणी आले. त्यामुळे कुर्ला आणि सायनदरम्यान दुपारी १.५५ मिनिटांपासून मध्य रेल्वेची वाहतूक बंद केली होती. सीएसएमटी ते ठाणे वाहतूक सायंकाळी ५.३० वाजता सुरू करण्यात आली.

Web Title: Mumbai, Thane slow down due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.