मुंबई, ठाणेकरांसाठी पुढील तीन दिवस ‘ताप’दायक; नागरिकांनी दुपारी बाहेर पडताना खबरदारी घ्यावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 06:12 IST2026-02-13T06:11:49+5:302026-02-13T06:12:18+5:30
उष्ण वाऱ्यांच्या प्रभावामुळे पारा चढणार ३७ अं.से. वर, हवामानातील असे बदल फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अधूनमधून जाणवतात. यंदा प्रथमच अशी स्थिती निर्माण झालेली नाही, असे हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले.

मुंबई, ठाणेकरांसाठी पुढील तीन दिवस ‘ताप’दायक; नागरिकांनी दुपारी बाहेर पडताना खबरदारी घ्यावी
मुंबई - पूर्वेकडून मुंबईकडे येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे पुढील तीन दिवसांत मुंबईच्या कमाल तापमानात तीन अंश सेल्सिअस वाढीचा अंदाज आहे. शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी मुंबईचा पारा कमाल ३६ अंश सेल्सिअसपर्यंत चढू शकतो, तर ठाणे आणि नवी मुंबईचे तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. वाढलेल्या उष्णतेमुळे मुंबईकरांना फेब्रुवारीतच उन्हाच्या झळांचा अनुभव घ्यावा लागत आहे.
सध्या मुंबईचे कमाल तापमान ३३ ते ३४ अंशांदरम्यान नोंदवले जात आहे. मात्र, हवामानातील संभाव्य बदलांमुळे ते ३६ अंशांपर्यंत पोहोचू शकते. ठाणे आणि नवी मुंबईचे तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
यंदा प्रथमच ही स्थिती उद्भवलेली नाही...
अरबी समुद्राकडून मुंबईकडे वाहणारे वारे साधारणतः सकाळी ११ वाजेपर्यंत स्थिर होतात. मात्र सध्या हे वारे दुपारनंतर किंवा संध्याकाळी स्थिर होत असल्याचे निरीक्षण आहे. दुपारच्या उष्णतेमुळे हे वारे अधिक तापत असल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. हवामानातील असे बदल फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अधूनमधून जाणवतात. यंदा प्रथमच अशी स्थिती निर्माण झालेली नाही, असे हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले.
ऊन वाढणार, काळजी घ्या
एप्रिल आणि मेमध्ये कमाल तापमान तुलनेने जास्त असले तरी आर्द्रता अधिक असते. परिणामी, असह्य उकाडा जाणवतो आणि घामाघूम अवस्था जाणवते.
मात्र फेब्रुवारी आणि मार्चमध्ये वातावरण कोरडे असल्याने घाम कमी येतो; परंतु तापमान जास्त असल्याने अस्वस्थता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून संरक्षण करणे आवश्यक आहे.
हवामान विभागाचा अंदाज
महामुंबई परिसरातील तापमानवाढीबाबत मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागानेही पुढील तीन दिवसांसाठी कमाल तापमानात वाढीचा अंदाज वर्तवला आहे. नागरिकांनी दुपारी बाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.