मुंबई-रत्नागिरी एसटीत बिघाड; चाकरमान्यांचा ७ तास खोळंबा, पर्यायी बस न दिल्याने ३८ प्रवासी मुंबईतच अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 07:08 IST2026-03-05T07:07:54+5:302026-03-05T07:08:05+5:30
मुंबईहून सकाळी साडेसात वाजता सुटलेली रत्नागिरी बस सायन पुलावर बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना पुलावरच थांबावे लागले.

मुंबई-रत्नागिरी एसटीत बिघाड; चाकरमान्यांचा ७ तास खोळंबा, पर्यायी बस न दिल्याने ३८ प्रवासी मुंबईतच अडकले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) मुंबईहून रत्नागिरीकडे जाणारी बस बुधवारी सकाळी बंद पडल्याने होळीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला. पर्यायी बसची व्यवस्था न केल्याने या बसमधील ३८ प्रवाशांना तब्बल सात तास मुंबईतच थांबावे लागले.
मुंबईहून सकाळी साडेसात वाजता सुटलेली रत्नागिरी बस सायन पुलावर बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना पुलावरच थांबावे लागले. तात्पुरती दुरुस्ती करून बस पनवेल आगारापर्यंत नेण्यात आली. चालक आणि वाहकांनी बस बिघाडाची माहिती संबंधित आगाराला दिली. मात्र, दुपारी दोन वाजेपर्यंत पर्यायी बस उपलब्ध करून देण्यात आली नव्हती, असा प्रवाशांचा आरोप आहे. तर एसटी हेल्पलाइनवर प्रवाशांनी संपर्क केला. मात्र, सुरुवातीला प्रतिसाद मिळाला नाही. नंतर संपर्क झाल्यावर ही सुविधा केवळ विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी असल्याचे ऑपरेटरने सांगितल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे.
तक्रार नोंदवण्यात अडचणी
बंद पडलेली बस ‘टाटा’ कंपनीची असल्याने तिची दुरुस्ती एसटीच्या नियमित मेकॅनिककडून शक्य नसून कंपनीच्या तंत्रज्ञांकडूनच करावी लागेल, असे चालक-वाहकांनी प्रवाशांना सांगितले. तर तक्रार नोंदवण्यासाठी अडचणी येत असल्याची खंत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्याचे प्रवाशांनी सांगितले.
संबंधित गाडी प्रायव्हेट ऑपरेटरची होती. गाडी रत्नागिरी आगाराची असून, ती बिघडल्याचे ड्रायव्हर आणि कंडक्टरने संबंधित डेपोला तसेच आम्हाला कळवले नाही. याबद्दल समजल्यावर प्रवाशांची तत्काळ व्यवस्था करण्यात आली.
अभिजीत पाटील,
विभाग नियंत्रक, मुंबई विभाग