मुंबई : पावसाच्या मुंबईत अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. सोमवारी मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसाची कुलाबा वेधशाळेत ६१ मिलिमीटर, तर सांताकुझमध्ये ४१ मिलिमीटर एवढी नोंद झाली आहे.
दुसरीकडे पावसाचा खेळ सुरू असतानाच मंगळवारी सकाळी ७ दरम्यान भांडुपमधील पंजाबी चाळ येथे नाल्यालगत असलेली भिंत पडून तीन जण जखमी झाले आहेत. वनिता सांवत, योगेश पाल आणि मनीषा पाल अशी जखमींचे नावे असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात, कोकण पट्ट्यात पावसाचा बऱ्यापैकी जोर आहे. मुंबईतही पाऊस अधूनमधून कोसळत असला तरी त्याचा मारा कायम नाही. उलटपक्षी मध्यरात्री वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे.
सोमवारी मध्यरात्रीही मुंबईत चांगल्या पावसाने हजेरी लावली. मात्र, दिवसभर पावसाने पाठ फिरवली. तर बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश साधारणत: ढगाळ राहील आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता आहे.
कोकणाला 'ऑरेंज' अलर्ट
मुंबईवगळता कोकणात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरील परिसरांना बुधवारी ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे तर, मुंबईसह विदर्भातील जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट आहे.
कोकण किनारपट्टीवर बुधवारी रात्री ८:३० वाजेपर्यंत ४ ते ४.२ मीटरपर्यंतच्या उंच लाटा उसळतील, असा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने दिला आहे. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मंगळवारी सकाळपर्यंत पालघर जिल्ह्यात ८२.२ मि.मी. पाऊस झाला आहे. रायगड जिल्ह्यात ८२.२, मुंबई शहर जिल्ह्यात ६१.२, ठाणे जिल्ह्यात ५९.३ आणि रत्नागिरी जिल्ह्यात ५०.६ मि.मी. सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी आणि रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी इशारा पातळीवर असून, याबाबत नागरिकांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.