मुंबई : वर्सोवा-घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेवर आता घाटकोपर ते अंधेरी शटल सेवा बंद करून त्याऐवजी संपूर्ण मार्गावर गाडी चालविण्याचा निर्णय मुंबईमेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) घेतला आहे. सोमवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, त्यामुळे आता मेट्रोच्या फेऱ्याही वाढल्या आहेत. या मार्गावर आता गर्दीच्यावेळी दर ३ मिनिटे २० सेकंदांनी मेट्रो धावणार असून, त्यातून मेट्रोच्या ४५२ फेऱ्या होणार आहेत.
मेट्रो १ मार्गिका ११.४ किमी लांबीची असून, त्यावर १२ स्थानके आहेत. सद्य:स्थितीत ही गाडी ४ डब्यांची आहे. या मार्गिकेवर कार्यालयीन दिवसात दररोज ५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यातून कार्यालयीन वेळेत मेट्रो मार्गिकेवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. यावर तोडगा काढण्यासाठी गर्दीच्यावेळी अंधेरी ते घाटकोपर या मार्गावर कमी अंतरासाठी शटल सेवा चालविण्याचा निर्णय एमएमओपीएलने घेतला होता. त्यानुसार ८ एप्रिलपासून कमी अंतरावरील फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यावेळी अंधेरी ते घाटकोपर मार्गावर दर ३ मिनिटे २५ सेकंदांनी मेट्रो गाडी धावत होती. मात्र, त्यानंतरही मेट्रोवरील प्रवासी संख्या कमी होताना दिसत नव्हती. त्यामुळे या मार्गावर दोन गाड्यांतील अंतर आणखी कमी करून फेऱ्यांमध्ये वाढ करणे शक्य आहे का, याची चाचपणी एमएमओपीएलने सुरू केली होती.
सध्याच्या एकूण फेऱ्या- ४५२गर्दीच्यावेळी दोन गाड्यांतील अंतर ३ मिनिटे २० सेकंदगर्दी नसताना दोन गाड्यांतील अंतर ७ मिनिटे