मुंबईची लाईफलाईन महिलांसाठी ठरतेय डेडलाईन, जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 15:11 IST2026-02-02T15:08:45+5:302026-02-02T15:11:53+5:30
Mumbai Local Train: दिवसेंदिवस रेल्वे लोकलमधील गर्दीतील प्रवास हा जीवघेणा ठरत आहे. महिलांना तर जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.

मुंबईची लाईफलाईन महिलांसाठी ठरतेय डेडलाईन, जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: दिवसेंदिवस रेल्वे लोकलमधील गर्दीतील प्रवास हा जीवघेणा ठरत आहे. महिलांना तर जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. पश्चिम रेल्वेवर अगदी तीन मिनिटांना लोकल सेवा असल्याचा दावा होऊनही सकाळी आणि संध्याकाळी महिला प्रवाशांना लटकत प्रवास करावा लागतो. नियोजित स्थानकात उतरेपर्यंत महिलांना मोठा संघर्ष करावा लागतो. उपनगरीय आणि मध्य रेल्वेमध्येही पश्चिम उपनगरातील महिलांप्रमाणेच रेल्वे प्रवासात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. दररोज गर्दीमुळे धक्का लागल्याने होणारे वाद विकोपाला जाऊन जीव गमावण्याची वेळ प्रवाशावर येत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
विरार ते चर्चगेट लोकलमध्ये सकाळी, तर चर्चगेट ते विरार लोकलमध्ये सायंकाळच्या वेळी मोठी गर्दी असते. १२ डब्यांच्या लोकलमध्ये महिलांचे तीनच डबे असतात, त्यातच फर्स्ट क्लास डबादेखील असतो. तरी गर्दीच्या वेळी या लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. रेल्वे प्रवासादरम्यान आसनावर बसलेल्या महिलेची जागा ती उतरल्यानंतर बसण्यासाठी आधीच अडवली जाते, यावरून महिलांमध्ये वाद होतात. यासाठी प्रशासनाने नियमावली तयार करावी, असे मतही प्रवासी सुवर्ण कळंबे यांनी व्यक्त केले.
‘लेडीज स्पेशल वाढवा’
महिला प्रवाशांची संख्या जास्त आणि त्या तुलनेत डबे कमी असतात. दरवाजावरील प्रवाशांवर कारवाई करावी, जेणेकरून इतर प्रवाशांना डब्यात शिरता येईल. लेडीज स्पेशल लोकल कमी असल्याने त्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक
१) पश्चिम रेल्वेच्या महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्याप ते पूर्ण नाही. अनेक लोकलच्या महिला डब्यांमध्ये असलेली टॉक-बॅक यंत्रणा बंद पडलेली दिसून येते.
२) रात्रीच्या वेळी फर्स्ट क्लाससह, सेकंड क्लासमध्येही महिला पोलिस आवश्यक असून, गर्दीच्यावेळी प्लॅटफॉर्मवरही महिला पोलिसांसह आणि आरपीएफची गस्त वाढवून महिला सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे मत बोरीवलीतील मनीषा शिंदे यांनी व्यक्त केले.