मुंबई तापली! सलग दुसऱ्या दिवशी उकाड्याचा तडाखा; पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 10:08 IST2026-03-11T10:07:39+5:302026-03-11T10:08:04+5:30
राजस्थान आणि गुजरातमध्ये निर्माण झालेल्या अँटी सायकॉलॉनाचा विपरीत परिणाम म्हणून उष्ण वारे महाराष्ट्रासह कोकणाकडे वाहत आहेत.

मुंबई तापली! सलग दुसऱ्या दिवशी उकाड्याचा तडाखा; पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर
मुंबई : राजस्थान आणि गुजरातमध्ये निर्माण झालेल्या अँटी सायकॉलॉनाचा विपरीत परिणाम म्हणून उष्ण वारे महाराष्ट्रासह कोकणाकडे वाहत आहेत. या उष्ण वाऱ्यामुळे सोमवारपासून मुंबईत आणि आसपासच्या परिसरात आलेली उष्णतेची लाट मंगळवारीही कायम होती.
सोमवारी मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३८ अंश नोंदविण्यात आला होता. दिवस आणि रात्र अशा दोन्ही तापमानात वाढ होत असल्याने मुंबईकरांचे २४ तास उष्णतेचे ठरत आहेत. मंगळवारी मुंबई सोबत ठाणे, रायगड व पालघर या तीन जिल्ह्यांतही कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास नोंद झाला. मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासूनच मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या सूर्यकिरणांनी मुंबईकरांना चटके देण्यास सुरुवात केली होती. दुपारी १२ वाजल्यापासून सूर्य डोक्यावर आल्यानंतर मुंबईकरांना बसणाऱ्या चटक्यामध्ये आणखी वाढ झाली. दुपारी १ वाजल्यापासून ३ वाजेपर्यंत रस्त्यावरची कामाव्यतिरिक्त असलेली गर्दी कमी झाल्याचे चित्र होते.
आजपासून पारा किंचित घसरणार
बुधवारपासून मुंबईच्या कमाल तापमानात किंचित घसरण होण्याची शक्यता असून हा कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली. त्यामुळे बुधवारी सूर्याचे चटके कमी होतील, अशी शक्यता असली तरी उष्ण वातावरण कायम राहणार असल्याने एप्रिल आणि मे महिन्याचा तडाखा नागरिकांना मार्चमध्येच बसू लागला आहे. त्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.