मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 08:08 IST2025-06-11T08:07:37+5:302025-06-11T08:08:03+5:30
Mumbai Water Supply: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील एकूण पाणीसाठा १० टक्क्यांवर आल्यामुळे येत्या २ दिवसांत राखीव साठ्यातून मुंबईची तहान भागविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील एकूण पाणीसाठा १० टक्क्यांवर आल्यामुळे येत्या २ दिवसांत राखीव साठ्यातून मुंबईची तहान भागविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुंबईचा पाणीसाठा १० टक्क्यांपेक्षा खाली आल्यास भातसा व अप्पर वैतरणातील राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. त्यानुसार उर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लिटर तर भातसा धरणातून १ लाख १३ हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा मुंबईला उपलब्ध होणार आहे.
मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सातही धरणांची पाणीसाठवण क्षमता ही १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. यातून मुंबईला दररोज तीन हजार ९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याची वाढती मागणी, तलावांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यामुळे सध्या धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे.
सध्या सात धरणांत एकूण १ लाख ४५ हजार ७१३ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा पाच टक्के जास्त असला तरीही पाणीचिंता कायम आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून उपलब्ध करून दिलेल्या पाण्याचा वापर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. हा राखीव साठा ३१ जुलैपर्यंत पुरणार असल्याचे मत पालिकेकडून व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांवर तूर्तास तरी पाणीकपातीची टांगती तलवार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
धरणातील पाणीसाठ्याची सद्य:स्थिती
जलाशय क्षमता उपलब्ध साठा टक्क्यांमध्ये
द.ल.लि. द.ल.लि.
अप्पर वैतरणा २२७०४७ १६९६ ०.७५
मोडक सागर १२८९२५ ३६०१२ २७.९३
तानसा १४५०८० १५४२२ १०.६३
मध्य वैतरणा १९३५३० १९३५३० १३.७४
भातसा ७१७०३७ ५४५०० ७.६०
विहार २७६९८ ९१२३ ३२.९५
तुळशी ८०४६ २३७५ २९.५२