Mumbai Best: जाऊ दे रे गाडी... आता रात्री १२ नंतरही मिळणार 'बेस्ट' सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 21:07 IST2022-03-04T21:06:55+5:302022-03-04T21:07:21+5:30
Mumbai Best: मुंबईतील २८ लाख प्रवाशी बेस्ट बसगाड्यांमधून प्रवास करीत असतात.

Mumbai Best: जाऊ दे रे गाडी... आता रात्री १२ नंतरही मिळणार 'बेस्ट' सेवा
मुंबई - रेल्वे सेवा रात्री १२ वाजता बंद झाल्यानंतर रेल्वे स्थानकांवर अडकून पडणाऱ्या प्रवाशांना बेस्ट दिलासा मिळणार आहे. कामानिमित्त रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचता यावे, यासाठी बेस्ट उपक्रमामार्फत रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत प्रत्येक तासाला काही ठराविक बसमार्गांवर बससेवा सुरु करण्यात येणार आहे. ही सेवा येत्या सोमवारपासून सुरु करण्यात येणार आहे.
मुंबईतील २८ लाख प्रवाशी बेस्ट बसगाड्यांमधून प्रवास करीत असतात. मात्र त्यापेक्षा दुप्पट प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असतात. यापैकी कामानिमित्त बाहेर असलेले प्रवासी विशेषत: रुग्णालय, हॉटेल, विमानतळ अशा विविध ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी पोहचण्यास वाहतुकीचे कोणतेही साधन उपलब्ध होत नाही. अशा प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय असल्याने बेस्ट उपक्रमाकडून रात्रीच्या वेळेत विशेष बस सेवा सुरु करण्यात येणार आहेत.
बसक्रमांक... बसमार्ग
१ – इलेक्ट्रिक हाऊस ते माहिम बसस्थानक
६६ मर्या. – इलेक्ट्रिक हाऊस ते राणी लक्ष्मीबाई चौक
२०२ मर्या. – माहिम बसस्थानक ते पोयसर आगार
३०२ – राणी लक्ष्मीबाई चौक ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड)
३०५ – बॅकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक
४४० मर्या. – बोरिवली स्थानक पूर्व ते द्वारा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ
हात दाखवा बस थांबवा...
रात्रीच्या या बेस्ट सेवेला सर्वसाधारण प्रवासीभाडे आकारण्यात येणार आहे. तसेच हात दाखवा बस थांबवा या योजनेचा लाभ या प्रवाशांना घेत येणार आहे.