Join us  

मान्सून : मुंबईत ऑरेंज तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 6:49 PM

३ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर जिल्हयात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार सरी कोसळतील.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असतानाच ३ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर जिल्हयात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार सरी कोसळतील. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. 

४, ५ आणि ६ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर उर्वरित महाराष्ट्राचा विचार करता धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर येथे पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. तर पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्हयात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेडसह लगतच्या जिल्हयांत तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, रविवारी मुंबईत संपुर्ण दिवस पावसाने विश्रांती घेतले. कुठे तरी आलेली तुरळक सर वगळता मुंबईकरांचा रविवार कोरडा गेला.  

टॅग्स :मानसून स्पेशलपाऊसमुंबईठाणेपालघररायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग