Join us

नारायण राणेंच्या टीकेविरोधात मनसे, उद्धवसेनेची युती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:19 IST

आदित्य ठाकरे बोलल्यावर त्यांना बोलावेच लागते. नाही तर त्यांची गैरसोय होते

मुंबई : भाजप खासदार नारायण यांनी केलेल्या टीकेला उद्धवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत व ‘मनसे’चे मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांचा स्वतःचा पक्ष आहे. तुम्ही स्वतःचा पक्ष काढला असता तर तुम्हाला मानले असते, असा पलटवार खा. राऊत यांनी केला. तर, आदित्य ठाकरे बोलल्यावर त्यांना बोलावेच लागते. नाही तर त्यांची गैरसोय होते, अशी टीका ‘मनसे’चे किल्लेदार यांनी केली आहे.

मनसे व उद्धवसेना यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरून खा. राणे यांनी कोणीही एकत्र आले तरी भाजपच्या पुरात टिकणार नाहीत. काय आहे त्यांच्याकडे? दोघांचाही हिशोब करा. त्यांची ताकद काय?, अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना मनसे नेते किल्लेदार यांनी लोकसभा निवडणुकीत राणेंनी राज ठाकरे यांना सभा घ्यायला का सांगितली? त्याचा तुम्हाला फायदा झाला नाही का?, असा सवाल केला. 

उद्धवसेनेचे खा. राऊत यांनी राज ठाकरे यांचा स्वतःचा पक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे चोरलेला पक्ष आहे आणि तुम्ही भाजपचे आश्रित आहात. उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे २० आमदार, ९ खासदार आहेत. भाजपचे किती खासदार आहेत, तो आकडा मोजावा, असा टोला लगावला.

स्वतंत्र लढल्यास पक्षाला होणार फायदा

पक्ष कोणताही असो त्याला स्वतंत्र किंवा अन्य पक्षासोबत युती करून निवडणूक लढविण्याचा हक्क आहे. कुणी स्वतंत्र लढायचे हा त्या-त्या पक्षाचा निर्णय असेल. परंतु, सगळे पक्ष वेगळे लढल्यास चित्र वेगळे असेल. त्याचा मनसेला फायदा होईल, असे किल्लेदार म्हणाले. 

टॅग्स :नारायण राणेआदित्य ठाकरेमनसे