Join us

"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?

By मोरेश्वर येरम | Updated: June 6, 2025 13:28 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबई

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात दोन्ही बाजूनं कार्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. आज 'शिवतीर्थ'वर राज ठाकरेंनी पक्षाच्या विभागप्रमुखांची बैठक आयोजित केली होती. यात विभागप्रमुखांची आपल्या भावना व्यक्त करताना महत्वाचे मुद्दे राज ठाकरेंसमोर मांडले असल्याची माहिती समोर आली आहे. "दोन भावांमधील फुटीमुळे ठिकठिकाणी परप्रांतियांची दादागिरी वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", अशी भावना मनसे पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी आज बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर पक्षाच्या केंद्रीय समितीच्या पदाधिकाऱ्यांना युतीबाबत सध्या कोणतंही भाष्य करू नका अशा सूचना राज यांनी दिल्या आहेत. त्यामुळे अद्याप युतीबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, कार्यकर्ते मात्र युतीसाठी सकारात्मक आहेत. गेल्या काही दिवसात ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी एकत्र आल्याचंही पाहायला मिळालं आहे. नुकतंच कल्याण-डोंबिवलीत एका पुलाच्या कामाच्या प्रश्नावरुन ठाकरे गटाने केलेल्या आंदोलनाला मनसेचे नेते राजू पाटील देखील मनसे कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. तर नाशिकमध्ये मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी "आम्ही एकत्र आलोय, तुम्हीही एकत्र या", अशी भावना व्यक्त केली होती. 

फक्त एक फोन...'शिवतीर्थ'वरील मनसेच्या आजच्या बैठकीनंतर मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेना-मनसे युतीबाबत महत्वाचं विधान केलं. "प्रसारमाध्यमांसमोर भाष्य करुन युती होत नसते. ठाकरे गटाला वाटत असेल की मनसेसोबत युती केली पाहिजे. तर फक्त एक फोन केला की मार्ग निघू शकतो. त्यामुळे तुम्ही १ पाऊल पुढे आलात तर मला राज साहेबांवर विश्वास आहे की ते १०० पावलं पुढे येतील", असं अविनाश जाधव म्हणाले.

फोन झालाही असेल...ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र दोन्ही भावांमध्ये फोन झालाही असेल, असं विधान केलं आहे. पहिला फोन किंवा पहिला संवाद कोण करणार हा मुद्दा आहे. दोन्ही भावांचा नंबर एकमेकांकडे आहे. आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करावा, त्यामुळे मुद्दा इगोचा राहिला आहे का, अशा आशयाचा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला. यावर बोलताना, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या मुलांच्या जन्माच्या आधीपसून हे भाऊ आहेत ना. मी दोघांनाही पाहिले आहे. १० मिनिटांनी मी आता राज ठाकरेंना फोन करणार आहे किंवा १० मिनिटांनी मी आता उद्धव ठाकरेंना फोन करतो, असा सोशल मीडियावर मेसेज टाकून दोन्ही बंधू एकमेकांना फोन करणार नाही. काय सांगावे, फोन झालेही असतील, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले. तुम्हाला फळ दिसल्याशी मतलब आहे ना. प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. काही दिवसांनी तुम्ही म्हणाल की, झाडाला खूपच फळे आली आहेत, इतक्या गोष्टी पुढे गेलेल्या दिसतील, असा सूतोवाच संजय राऊतांनी केला.

टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरेमनसे