Join us  

Raj Thackeray: वाझे हा उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती; केंद्रानं चौकशी करावी- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 12:21 PM

Raj Thackeray On Mukesh Ambani Bomb Scare: सचिन वाझेला शिवसेनेत घेऊन येणारा कोण? आणि कुणाच्या आदेशाशिवाय बॉम्ब ठेवण्याचं धाडस पोलीस करणार नाहीत; राज ठाकरे यांचा हल्लाबोल

Raj Thackeray On Mukesh Ambani Bomb Scare: "दहशतवादी बॉम्ब ठेवतात असं आपण आजवर घटना पाहत आलो. पण आता पोलीस बॉम्ब ठेवतात ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय धक्कादायक बाब आहे. बॉम्ब ठेवणारा सचिन वाझे हा उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारकडून योग्य पद्धतीनं होणार नाही. केंद्र सरकारनं या प्रकरणाची कसून चौकशी करायला हवी", अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Raj Thackeray Demands Central Government to inquire in the mukesh ambani bomb scare case and allegations on Anil Deshmukh)

"परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र हे गंभीर आहेच. पण मूळ प्रश्न अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला कुणी? कुणाच्या आदेशाशिवाय एखाद्या पोलिसाकडून बॉम्ब ठेवण्याचं धाडस होणार नाही. त्यामुळे यामागचे खरे हात वेगळेच आहेत. सचिन वाझेची आता धिंड काढली जातेय. पण त्याला शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी घेऊन कोण गेलं होतं? फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याची वारंवार मागणी केली होती, असं फडणवीस यांनी स्वत: सांगितलं आहे. म्हणजे सचिन वाझे हा व्यक्ती उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचा आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. त्यामुळे हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. याची कसून चौकशी राज्याकडून नव्हे, तर केंद्राकडून व्हायला हवी. मग कशी राज्यात फटाक्यांची माळ लागते ते पाहा. कुणाकुणाची नावं बाहेर येतील याची कल्पना देखील आपण करू शकत नाही", असं राज ठाकरे म्हणाले. 

परमबीर सिंग यांची बदली नेमकी कशासाठी?"बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणात जर सचिन वाझेचा हात होता. मग मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली का केली गेली? आणि जर परमबीर सिंगही यात सामील असतील मग त्यांची चौकशी न करता त्यांची बदली का केली गेली? या प्रश्नाचं उत्तर सरकारनं द्यावं. कारण परमबीर सिंग यांच्या बदलीचं नेमकं कारणंच सरकारनं दिलेलं नाही", असं राज ठाकरे म्हणाले. 

मुंबईचं १०० कोटींचं टार्गेट मग इतर शहरांचं काय?राज्याचा गृहमंत्री मुंबईसारख्या शहराच्या पोलीस आयुक्तांना वसुलीचं टार्गेट देतो हा अतिशय घाणेरडा प्रकार असून मुंबईसाठी जर देशमुखांनी १०० कोटींचं टार्गेट दिलं होतं तर इतर शहरांमध्ये काय परिस्थिती असेल?, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. यासोबत परमबीर सिंग मुंबईचे पोलीस आयुक्त होऊन वर्षभराचा कालावधी झाला आहे. जर महिन्याला १०० कोटी पकडले तर वर्षाचे १२०० कोटी रुपये जमा झाल्याचं आपण समजायचं का? इतका पैसा गेला कुठे?, असे सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेमुकेश अंबानीसचिन वाझेअनिल देशमुखपरम बीर सिंगउद्धव ठाकरे