राज्यात मिश्र हवामान; वादळी वारे, ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 10:16 IST2026-03-13T10:13:20+5:302026-03-13T10:16:34+5:30
मुंबईचा कमाल तापमानाचा पारा खाली आला तरी राज्यभरातील कमाल तापमान वाढलेलेच आहे. तापमानाचा पारा वर-चढ असतानाच दुसरीकडे हवामानात सतत बदल होत आहेत.

राज्यात मिश्र हवामान; वादळी वारे, ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता
मुंबई : मुंबईचा कमाल तापमानाचा पारा खाली आला तरी राज्यभरातील कमाल तापमान वाढलेलेच आहे. तापमानाचा पारा वर-चढ असतानाच दुसरीकडे हवामानात सतत बदल होत आहेत. परिणामी राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार असून, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेने दिलासा दिला असून, गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश नोंदविले आहे. हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, १३ ते १६ मार्चदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विजांचा कडकडाट होईल, वादळी वारे वाहतील. १३ आणि १४ मार्च रोजी उत्तर कोकणात काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईच्या हवामानात बऱ्यापैकी फेरबदल नोंदविण्यात येत असून, रात्रीचे हवामानही उष्ण आहे. परिणामी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
१३ ते १७ मार्चपर्यंतच्या पाच दिवसांत मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. १५-१६ मार्च या दोन दिवशी विदर्भ-मराठवाड्यासह धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गडगडाटी स्वरूपाच्या किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. १४ मार्चपर्यंत अलिबाग, डहाणू, जळगाव, नाशिक, अकोला, अमरावती, बुलडाणा येथे उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती जाणवेल.
माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
कमाल तापमान अंश सेल्सिअस
अहिल्यानगर ३७.९
छत्रपती संभाजीनगर ३९.८
डहाणू ३७.२
जळगाव ४०.४
मालेगाव ३९.४
मुंबई ३३.१
नाशिक ३७.८
धाराशिव ३७.५