मुंबई : मित्राला भेटायला गेलेल्या एका १५ वर्षीय मुलीने ३० व्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपविल्याची खळबळजनक घटना भांडूपमध्ये घडली आहे. मित्रामुळेच तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी आता केली आहे. अस्मी अक्षय चव्हाण (१५) असे या मृत मुलीचे नाव असून ती मुलुंडची रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता भांडूपच्या एल. बी. एस. रोडवरील महिंद्रा स्प्लेंडर सोसायटीत ही घटना घडली.
येथील ए विंगमध्ये राहणाऱ्या आदित्य अरुण (१९) याच्यासोबत तिची शाळेपासून ओळख होती. तोही सध्या शिक्षण घेत आहे. मंगळवारी ती आदित्यला भेटण्यासाठी सोसायटीत आली.
वर गेले लिफ्टने, उतरले मात्र पायऱ्यांनी?
तिच्या मामाच्या आरोपानुसार, मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले असून याची सखोल चौकशी करावी. आदित्य ए विंगमध्ये राहत असताना ते दोघे डी विंगकडे का नेले?
जाताना ते लिफ्टने गेले असताना येताना पायऱ्यांनी का आले? नेमका दोघांमध्ये काय संवाद झाला? कुठल्या कारणातून तिने उडी घेतली? याबाबत भांडूप पोलिस तपास करीत आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्हीही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.