Join us  

सरकारमध्ये मंत्री अन् काही आमदारांची नाराजी आहे, मात्र तरीही सरकार टिकेल- संजय राऊत

By मुकेश चव्हाण | Published: November 29, 2020 10:11 AM

विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीत आहे, असं संजय राऊतांनी सांगितले. 

मुंबई: महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सत्ताधारी व विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. याचदरम्यान आता महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यामागे महत्वाची भूमिका बजावलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सामना'तील लेखातून महाविकास आघाडीच्या सरकारबाबत विविध खुलासे केले आहेत.

भाजपाचे नेते महाविकास आघाडीचं सरकार टिकणार नाही. ते अंतर्गत वादामुळे लवकरच कोसळेल, असा दावा करत आहे. संजय राऊतांनी दावा असा दावा करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्रातील सध्याचे अनैसर्गिक सरकार टिकणार नाही असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील वगैरे नेते सांगतात. राजकारणात कुणी साधुसंत वगैरे नसतो. तसे कोणतेही सरकार हे नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसते. विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीत आहे, असं संजय राऊतांनी सांगितले. 

अटल बिहारी वाजपेयी यांनी ३३ भिन्न विचारांच्या पक्षांचे ‘एनडीए’सरकार पाच वर्षे चालवले. त्यात ममता बॅनर्जी होत्या. जयललितांचा पक्षही होता. ते सरकार कुणाला अनैसर्गिक वाटले नाही. मग तिघांचे सरकार निसर्गविरोधी कसे, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. संपूर्ण बहुमताचे सरकार असले तरी त्यात नाराज लोक असतातच. इथे तर तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. त्यात नाराजी आहे. मंत्र्यांची व काही आमदारांची नाराजी व्यक्तिगत मानपानाची आहे. मात्र तरीही सरकार टिकेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर लक्ष ठेवा असे अलीकडे सातत्याने सांगितले जाते, पण आज सगळ्यात जास्त भरवशाचे अजित पवार असल्याचे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.

पवारांना पहिल्यांदाच मी इतकं संतापलेलं पाहिलं- संजय राऊत

सरकार स्थापनेसंदर्भात काँगेसचा स्पष्ट होकार आला नव्हता. मात्र स्वर्गीय काँग्रेसचे अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते. नेहरू सेंटरमधल्या २२ नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे व अन्य काही नेत्यांनी घेतली. खरगेंच्या या भूमिकेनंतर त्यांच्यात व शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. शरद पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल धावत गेलो. 

पवारांना पहिल्यांदाच मी इतकं संतापलेलं पाहिलं, ते त्र्यागानं बैठकीतून निघाले; राऊतांचा गौप्यस्फोट

'''त्या' बैठकीत अजित पवार फोनवर चॅटिंग करत होते, त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ झाला- संजय राऊत

सत्ता स्थापनेच्या बैठकीत सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच सुचवले, पण मल्लिकार्जुन खरगे, पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला, असा खुलासा संजय राऊतांनी केला आहे. हे सगळं सुरु असताना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे बराच काळ त्यांच्या मोबाईल फोनवर खाली मान घालून ‘चॅटिंग’करत होते. त्यानंतर तेही बैठकीतून बाहेर पडले. अजित पवारांचा फोन त्यानंतर ‘स्विच ऑफ’झाला व दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळ्यात झाले,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

"'त्या' बैठकीत अजित पवार फोनवर चॅटिंग करत होते, त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ झाला; अन्..."

टॅग्स :संजय राऊतशिवसेनामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारभाजपा