'टाइमपास टोळीला काम मिळालं, हे पाहून बरं वाटलं'; आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 10:01 IST2022-04-04T10:01:41+5:302022-04-04T10:01:54+5:30

मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

Minister Aditya Thackeray has criticized MNS chief Raj Thackeray | 'टाइमपास टोळीला काम मिळालं, हे पाहून बरं वाटलं'; आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

'टाइमपास टोळीला काम मिळालं, हे पाहून बरं वाटलं'; आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

मुंबई- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात अनेकांवर जोरदार टीका केली. बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. 

१९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झालं. यापूर्वी जात ही जातीचा अभिमान होता. परंतु १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या जन्मानंतर त्यांनी जातीचा द्वेष करायला लावला," असं म्हणत राज ठाकरे यांनी टीका केली होती. राज ठाकरेंच्या टीकेला महाविकास आघाडीतील मंत्र्यांकडूनही मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर दिले जात आहे. 

मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. एका वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे भाजपाची सी टीम असल्याचा उल्लेख करत निशाणा साधला. तसंच टाइमपास टोळीला काम मिळालं हे पाहून बरं वाटलं, असा टोलाही लगावला. जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं याचा विचार केला पाहिजे असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

भाजपाचं राजकारण पाहिलंत तर ज्या राज्यात सत्ता हवी आहे तिथे या दोन्ही पक्षांना वापरुन, एकमेकांविरोधात बोलून, काही घटना घडवून, हिंदू मुस्लिम दंगली घडवून सरकार स्थापन कसं करायचं याकडे लक्ष दिसत आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच हिंदुत्वासाठी सतत लढण्याची गरज नसते. राजकीय पक्ष म्हणून जी वचनं देतो ती पूर्ण करणंही हिंदुत्व आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

ब्लू प्रिंट देणारे राज हेच आहेत का?- मंत्री जितेंद्र आव्हाड

लाखोंच्या सभेसमोर टाळ्या घेण्यासाठी बोलणे फार सोपे असते. पाच वर्षांपूर्वी जे राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट सादर करायचे की, असे उद्योग आणले पाहिजेत तसे उद्योग आणले पाहिजे. कधी रतन टाटाशी चर्चा, कधी गोदरेजशी चर्चा, कधी यांच्याशी चर्चा कधी त्यांच्याशी चर्चा, असे एक विकासाचे मॉडेल घेऊन पोरांना नोकऱ्या लावतो, असे म्हणायचे. ब्लू-प्रिंट देणारे राज ठाकरे आता त्याच पोरांना मशिदीच्या बाहेर भोंगे लावण्यास सांगतात. ही विचारांची प्रगती आहे की अधोगती आहे हे समजत नाही, असा टोला मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. 

Web Title: Minister Aditya Thackeray has criticized MNS chief Raj Thackeray