Join us

मातोश्रीवर 48 लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक, शिवसेनेकडून 'भाजपाला शह'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 21:45 IST

शिवसेना आगामी निवडणूक स्वबळावर लढेल अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गतवर्षी 23 जानेवारीला वरळी येथील शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात केली होती.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी बैठकींचे सत्र मातोश्रीत सुरूच असल्याचे दिसून येते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः राज्यातील 48 लोकसभानिहाय शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका मातोश्रीत घेत असल्याची माहिती शिवसेनेतील सुत्रांनी दिली. त्यामुळे भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेकडून 48 मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी सध्या मातोश्रीत मुंबईतील 6 लोकसभा मतदार संघासह राज्यांतील सर्व लोकसभा मतदार संघनिहाय बैठका उद्धव ठाकरे घेत आहेत. मुंबईतील विभागप्रमुख, आमदार, उपविभागप्रमुख, नगरसेवक आणि शाखाप्रमुखांच्या बैठकीचे सत्र सध्या मातोश्रीत सुरू आहे.

शनिवारी मातोश्रीत ईशान्य मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत युती झाल्यास ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून सोमय्या नको, अशी ठाम भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास शिवसैनिक त्यांच्यासाठी प्रचार करणार नाहीत. एकही शिवसैनिक त्यांना मत देणार नाही, असं शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याची माहितीही सुत्रांनी दिली. किरीट सोमय्या यांनी अनेकवेळा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात सोमय्यांबद्दल प्रचंड राग आहे. 

शिवसेना आगामी निवडणूक स्वबळावर लढेल अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गतवर्षी 23 जानेवारीला वरळी येथील शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात केली होती. उद्धव ठाकरे हे अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम असून जर सन्मानाने युती झाली तर ठीक, अन्यथा शिवसेना स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचे संकेत त्यांनी मातोश्रीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले आहेत.मी शिवसेनेच्या सर्व खासदारांशी बैठकीत व खाजगीत बोललो. प्रसिद्धी माध्यमांमध्ये जरी उलट सुलट बातम्या येत असल्यातरी एकाही खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख नगरसेवक ते अगदी शाखाप्रमुखानेही मला युती करा असे सांगितले नाही. त्यामुळे शिवसेनेचा सन्मान हा ठेवलाच पाहिजे असेही संकेत उद्धव ठाकरे यांनी या बैठकीतून दिले आहेत.

राज्यात राजकीय अस्थिरता नको म्हणून शिवसेनेने राज्यात भाजपा बरोबर युती केली. गेली साडेचार वर्षे जरी शिवसेना भाजपाबरोबर सत्तेत असली तरी, शिवसेनेला भाजपाकडून मिळालेल्या वागणुकीमुळे शिवसेना दुखवलेली आहे. त्यामुळे सन्मानाने युती झाली तर ठिक अन्यथा जे होईल ते होईल, असे सांगत शिवसेना स्वबळावर लढण्यास सज्ज असून भाजपला धडा शिकवण्याची ठाम भूमिका उद्धव ठाकरेंनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्याचे समजते.  

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेमुंबईभाजपा