मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने, सरकार ॲक्शनमोडवर; सीएम एकनाथ शिंदे संवाद साधणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 13:38 IST2024-01-20T13:36:42+5:302024-01-20T13:38:43+5:30
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता आक्रमक पावित्रा घेतला आहे.

मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने, सरकार ॲक्शनमोडवर; सीएम एकनाथ शिंदे संवाद साधणार
CM Eknath Shinde ( Marathi News ) : मुंबई- मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता आक्रमक पावित्रा घेतला आहे. जरांगे पाटील आता आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत. जरांगे पाटील अंतरवली सराटी येथून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. हे आंदोलन २६ जानेवारीपर्यंत मुंबईत दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. तर आता दुसरीकडे राज्य सरकार ॲक्शनमोडवर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता वर्षा बंगल्यावर बैठकांचे सत्र सुरू केले आहे. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.
मनोज जरांगे पाटील हजारो मराठा आंदोलकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना
मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी ते मुंबई पायी प्रवास जरांगे करणार आहेत. आज दुपारी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त या बैठकीत सहभाग घेणार आहेत. आरक्षणबाबत सर्व माहिती मुख्यमंत्री आज घेणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आरक्षणाचे आंदोलन मुंबईत सुरु झाले तर कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावल्या बैठकीवर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे. यामुळे वर्षा बंगल्यावरील बैठक महत्वाची मानली जात आहे.
मनोज जरांगे पाटील बोलताना ढसाढसा रडले
"माझ मराठ्यांना शेवटच सांगणे आहे मी तुमच्यात असेल नसेल मला माहित नाही, मराठ्यांची एकजुट फुटू द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटायचे नाही. आपल्या मुलांना संपवण्याचा घाट का घातला आहे. आपली मुल संपली पाहिजेत अस त्यांना वाटत आहे, आमचं आंदोलन हे सहज घेत आहेत. आमच्या नोंदी सापडूनही हे आरक्षण देत नाहीत, असं जरांगे पाटील म्हणाले. यावेळी जरांगे पाटील भावूक झाले होते.
"मी समाजाला न्याय दिला पाहिजे, समाजात असेन नसेन याचे मला दु:ख होत आहे.मी समाज सुद्धा बघायला पाहिजे. या उपोषणामुळे मला शरीर जास्त साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची आहे. म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं आहे मराठ्यांची मुल मोठी व्हावीत म्हणून मुंबईकडे निघालो आहे. मी तुमच्यात असेल नसेल हा विचार संपवू द्यायचा नाही. हे आंदोलन बंद पडू द्यायचे नाही, आथा आरक्षण घेऊन मुलांचे डोक्यावर गुलाल टाकायचा आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढणार आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.