तक्रार निवारणाची 'महारेरा' एक्स्प्रेस... एकाच वर्षात घर खरेदीदारांच्या ६,९४५ तक्रारी निकाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 10:43 IST2026-04-01T10:42:59+5:302026-04-01T10:43:08+5:30
जुन्या तक्रारींचा निपटारा प्राधान्याने करण्यासाठी महारेरा प्रयत्नशील आहे

तक्रार निवारणाची 'महारेरा' एक्स्प्रेस... एकाच वर्षात घर खरेदीदारांच्या ६,९४५ तक्रारी निकाली
सचिन लुंगसे
मुंबई : महारेराने जानेवारी ते डिसेंबर २०२५ या एक वर्षात ६,९४५ तक्रारी निकाली काढल्या. याच काळात ५,०७३ तक्रारी दाखल झाल्या. यावर्षी तक्रारी निकाली काढण्याचे प्रमाण १३७ टक्के असून, हा आतापर्यंतचा विक्रम आहे. जुन्या तक्रारींचा निपटारा प्राधान्याने करण्यासाठी महारेरा प्रयत्नशील आहे. नवीन तक्रारींवर महारेरा तातडीने कारवाई करीत असून, एक-दोन महिन्यातच सुनावणीची प्रक्रिया सुरू करण्यात येते. सध्या प्रलंबित तक्रारींचे प्रमाण सहा हजारांच्या आसपास असले तरी बहुतेक तक्रारींची सुनावणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
काय झाले सात वर्षांत ?
२३,८५४ तक्रारी दाखल
१४,९०२ तक्रारींचा निपटारा
कशामुळे झाले हे शक्य ?
घरखरेदीदार आयुष्याची कमाई गुंतवून घर नोंदवतो. त्यामुळे घरखरेदीदारांच्या न्यायोचित हितांचे रक्षण करण्याची जबाबदारी महारेराची आहे.
त्यामुळे प्रकल्प पूर्ततेतील अडथळे लक्षात घेऊन महारेराने प्रकल्प नोंदणीच्या वेळीच कठोर छाननी करण्याची भूमिका घेतली आहे.
यासाठी वैधता, आर्थिक आणि तांत्रिक बाबी सर्वंकषपणे आणि कठोरपणे तपासणारे, छाननी करणारे तीन स्वतंत्र गट निर्माण केले. यात तरतुदींची पूर्तता झाल्याशिवाय प्रस्तावित प्रकल्पांना महारेरा नोंदणी क्रमांक दिला जात नाही, अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली.
महारेराची स्थापना
मे २०१७ ला घरखरेदीदारांच्या हितसंबंधांचे रक्षण करीत असताना स्थावर संपदा क्षेत्राचे नियमन आणि महारेराची स्थापना झाली. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी महारेराची स्थापना झाली.