महारेराने घर खरेदीदार ग्राहकांच्या ५२६७ तक्रारी काढल्या निकाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 12:04 IST2025-09-08T12:03:19+5:302025-09-08T12:04:05+5:30
ऑक्टोबर २४ ते जुलै २०२५ या दरम्यान महारेराने घर खरेदीदार ग्राहकांच्या विविध तक्रारींबाबत तब्बल ५२६७ तक्रारी निकाली काढल्या आहेत.

महारेराने घर खरेदीदार ग्राहकांच्या ५२६७ तक्रारी काढल्या निकाली
मुंबई : ऑक्टोबर २४ ते जुलै २०२५ या दरम्यान महारेराने घर खरेदीदार ग्राहकांच्या विविध तक्रारींबाबत तब्बल ५२६७ तक्रारी निकाली काढल्या आहेत. जुलै अखेरपर्यंत दाखल झालेल्या घर खरेदीदारांच्या तक्रारींची पहिली सुनावणीही झाली किंवा त्यातल्या काहींच्या सुनावणीसाठीच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत.
घरखरेदीदार आयुष्याची कमाई गुंतवून घर नोंदवतो. परंतु काही कारणाने आश्वासित वेळेत ताबा मिळाला नाही, गुणवत्ता बरोबर नाही, घर खरेदी करारात मान्य केलेल्या सोयी सवलती आणि इतरही काही बाबी नाहीत, अशा स्वरूपाच्या अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. या घरखरेदीदारांच्या न्यायोचित हितांचे रक्षण करण्याची जबाबदारी महारेराची आहे. त्यामुळे महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या तक्रारींची नोंद वेळच्यावेळी घेतल्या जावी. न्याय्य दिलासा दिला जावा. यासाठी महारेराचे अध्यक्ष मनोज सैनिक आणि त्यांचे सहकारी महारेरा सदस्य महेश पाठक आणि महारेरा सदस्य रविंद्र देशपांडे यांनी तक्रारींबाबत सुनावण्यांची गती वाढविण्याचे नियोजन केले. त्यांच्या या नियोजनाला यश येऊन इतके दिवस अनेक कालावधीसाठी प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्याचा सपाटा या तिघांनी लावला.
२०१७ ला महारेराची स्थापना झाली. तेव्हापासून महारेराकडे ३०८३३ तक्रारी दाखल झालेल्या आहेत . त्यापैकी २३ हजार ७२६ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. यात महारेरा स्थापनेपूर्वीच्या ३५२३ प्रकल्पातील २२६६१ तक्रारी आहेत तर महारेराच्या स्थापनेनंतर २२६९ प्रकल्पांच्या अनुषंगाने ६ हजार २१८ तक्रारी दाखल झालेल्या आहेत. सद्या राज्यात ५१,४८१ प्रकल्प नोंदणीकृत असून यापैकी ५७९२ प्रकल्पात तक्रारी आलेल्या आहेत.