उन्हाळ्यातही रक्तदान गरजेचे... परिषद 'अॅक्टिव्ह' मोडवर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 15:21 IST2026-04-04T15:21:51+5:302026-04-04T15:21:51+5:30
पुरेशा रक्तसाठ्यासाठी उपाययोजना राबवविणार

उन्हाळ्यातही रक्तदान गरजेचे... परिषद 'अॅक्टिव्ह' मोडवर !
मुंबई : उन्हाळ्याच्या महिन्यात, विशेषतः एप्रिल ते जून या कालावधीत, राज्यासह मुंबईत दरवर्षी रक्ताची टंचाई निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येते. मात्र, ही टंचाई होऊ नये, यासाठी राज्य रक्तसंक्रमण परिषदेने आता अॅक्टिव्ह मोडवर काम करण्यास सुरुवात केली आहे. शाळा कॉलेजांच्या सुट्टया तसेच अनेक नियमित रक्तदाते गावाकडे जाणे किंवा प्रवासावर असणे, यामुळे रक्तदानाचे प्रमाण घटते. परिणामी रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध राहण्यात अडचणी निर्माण होतात, हे लक्षात घेऊन विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य रक्तसंक्रमण परिषदेने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. सर्वप्रथम, रक्तदानाबाबत जनजागृती वाढविण्यावर भर दिला जात असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, तसेच विविध स्वयंसेवी संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सहकार्याने विशेष रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. "उन्हाळ्यातही रक्तदान आवश्यक आहे", हा संदेश व्यापक पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.
पोर्टलवर माहिती उपलब्ध
राज्यातील गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठा, रक्तदान शिबिरे तसेच इतर बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र शासनाने ई-रक्तकोष पोर्टल आहे. त्या ठिकाणी जाऊन रुग्णाचे नातेवाइक त्यांना हवे असलेले रक्त कुठे उपलब्ध आहे, याची माहिती मिळते.
बाहेरच्या राज्यात रक्त पाठविण्यावर प्रतिबंध
बाहेरच्या राज्यात रक्त पाठविण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रचलित रक्तपिशवीत ३५ दिवस रक्त राहते. त्यामुळे आता स्थगम (हीसुद्धा जुनी पद्धत असली तरी) रक्तपिशवी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे रक्त कालमर्यादा सात दिवसांनी वाढते.
तसेच समाजातील धर्मगुरू, प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्या संस्थेशी बोलून काही रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. तसेच रेल्वे विभागाशी बोलून रक्तदान पेढ्यांना स्टेशनवर शिबिर घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.