मुंबई: हवामान विभागाने पुढील ४८ तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिल्याने उद्या पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगरासह कोल्हापुरातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासकीय कार्यालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोहोचण्यास विलंब झाल्यास उशीरा येण्याची सवलत देण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांनी उद्या दि. ५ ऑगस्ट रोजी आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. उद्या सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरातील सर्व धरणं जवळपास भरली आहेत. त्यामुळे अनेक धरणांमधून विसर्ग सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या सर्व शाळा, प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयांना सुट्टी राहील, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले आहेत.
अतिवृष्टीच्या शक्यतेनं उद्या मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमधील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 22:33 IST