Maharashtra Politics :"लालबाग परळ म्हणजे कट्टर शिवसैनिक , मी सुधीरला मुंबईत पळवणार"; ठाकरेंची बीएमसीसाठी मोठी तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 16:22 IST2025-04-13T16:18:08+5:302025-04-13T16:22:42+5:30
Maharashtra Politics : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने सुधीर साळवी यांच्यावर मोठी जबाबदारी दिली.

Maharashtra Politics :"लालबाग परळ म्हणजे कट्टर शिवसैनिक , मी सुधीरला मुंबईत पळवणार"; ठाकरेंची बीएमसीसाठी मोठी तयारी
Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. ठाकरे गटाने मुंबई महानगरपालिका निवडणुकांची तयारी केली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या आहेत. लालबाग परळ येथील सुधीर साळवी यांच्यावर सचिव पदाची जबाबदारी दिली. आज सुधीर साळवी यांच्यासह लालबाग येथील कार्यकर्त्यांनी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लालबाग परळ येथील शिवसैनिकांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, सधीरवर मोठी जबाबदारी दिली आहे. सुधीर आता लालबागमध्ये राहिला, त्याला शिवसेनेचे सचिवपद दिलं आहे. लालबाग परळ म्हणजे कट्टर शिवसैनिक आलाच. काल परवा बातम्या आल्या उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी. पण, आपलं लक्ष आता मुंबई महानगरपालिका आहे, त्यासाठी सुधारला सचिव पद दिलेलं आहे, असंही ठाकरे म्हणाले.
"मी सुधीरला मुंबईत पळवणार आहे, सर्वच एकत्र आहात, एकजुटीने रहा. मुंबई आणि महाराष्ट्रावरील संकट बाजूला टाकण्यासाठी आपण एकत्र आहोत,असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीसाठी मोठी तयारी
मुंबई महानगर पालिकेची निवडणूक काही महिन्यात होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भाजपानेही निवडणुकीची मोठी तयारी केली आहे. शिवसेना ( ठाकरे गटाने ) मराठीचा मुद्दा पुढे आणला आहे. तर मनसेनेही मराठी मुद्द्यावरुन तयारीला सुरूवात केली आहे.
दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रवक्ते यांची नावे जाहीर केली आहेत.यानंतर आता सुधीर साळवी यांना पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी दिली आहे. लालबाग परिसर हा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. आता काही दिवसातच महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत . यामुळे आता मोक्याच्या वेळीच साळवी यांच्याकडे पद देऊन ठाकरे यांनी मोठी राजकीय खेळी केल्याची चर्चा सुरू आहे.