Join us  

Maharashtra Lockdown: राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन; उद्या घोषणा, रात्रीपासून अंमलबजावणीः सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 7:38 PM

मंत्रिमंडळ बैठकीत आज सर्वच सदस्यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी  लॉकडाऊनची महत्त्वाची मागणी केली. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज या सर्वांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसरकारच्या लॉकडाऊन घोषणेनुसार खासगी कार्यालये पूर्णपणे बंद राहतील. तर, सरकारी कार्यालयात 50 टक्क्यांपेक्षाही कमी कर्मचाऱ्यांनी हजर रहावे, ज्यांना शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा, असे सांगण्यात आलंय.

मुंबई - राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं निर्बंध आणखी कडक केले आहेत. राज्यात लवकरच संपूर्ण लॉकडाऊन जाहीर होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच, मंत्री अस्लम शेख यांनीही संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले होते. त्यानुसार, बुधवारी मध्यरात्रीपासून राज्यात पुढील 15 दिवसासाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भातील घोषणा बुधवारी होणार असल्याची मंत्रालयीन सुत्रांची माहिती आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. 

मंत्रिमंडळ बैठकीत आज सर्वच सदस्यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी  लॉकडाऊनची महत्त्वाची मागणी केली. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज या सर्वांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, ट्रेन बस पूर्णपणे बंद केल्या तर अत्यावश्यक सेवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, त्यावर आज आणि उद्या काळजीपूर्वक अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे, मुखमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनबद्दल निर्णय घेतला आहे. पण, त्यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री स्वत:च करतील, असेही टोपे म्हणाले होते. त्यानंतर, राज्यात बुधवारपासून 15 दिवसांचा कडक लॉकडाऊनचा निर्णय झाला असून उद्या यासंदर्भात घोषणा होणार असल्याची मंत्रालयातील वरिष्ठ सुत्रांची माहिती आहे. 

असा असेल कडक लॉकडाऊन

सरकारच्या लॉकडाऊन घोषणेनुसार खासगी कार्यालये पूर्णपणे बंद राहतील. तर, सरकारी कार्यालयात 50 टक्क्यांपेक्षाही कमी कर्मचाऱ्यांनी हजर रहावे, ज्यांना शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा, असे सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे, सार्वजनिक वाहतूकही सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात येणार असून केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच ती वाहतूक उपलब्ध राहिल. जिल्हाबंदीच्या दृष्टीकोनातूनही सरकार विचार करत आहे. त्यामध्ये, जिल्ह्याबाहेर जायचं असल्यास यापूर्वीप्रमाणे प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागणार असल्याचे समजते. 

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही राज्याची वाटचाल ही कडक लॉकडाऊनच्या दिशेनं आहे. ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याने लवकरच लॉकडाऊनची घोषणा होईल, असे अस्लम शेख यांनी म्हटलंय. 

अत्यावश्यक सेवांना सकाळी 7 ते 11 पर्यंतच परवानगी

राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह ), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतील. त्यानंतर संपूर्ण दिवसभर ही दुकानं बंद राहणार आहेत. 

15 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज - शिंगणे

राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले असले तरी लोकांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही. त्यामुळे, राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यासंदर्भातही राजेंद्र शिंगणे यांनी सकारत्मकता दर्शवली आहे. पूर्वीप्रमाणेच राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचं मी मुख्यमंत्र्यांशी फोनवर केलेल्या चर्चेत म्हटलं. आरोग्य यंत्रणेंवर सर्वात मोठा ताण येत आहे. मात्र, रुग्णांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे, रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात यावा, अशी आपली वैयक्तिक भूमिका असल्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.           कोरोनाची तिसरी लाट येणार - हसन मुश्रिफ

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र कोरोनाची तिसरी लाट ही येणार आहे, असे तज्ञ सांगत असून सर्वांनी एकत्रपणे कोरोनाचा सामना करणे गरजेचे आहे. सरकार ही आपल्या माध्यमातून सर्व उपाययोजना करत असून, पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयानक आहे. मात्र, सरकार योग्य सामना करेल आता माणसे जगवणे हीच आमची प्राथमिकता असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

टॅग्स :मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्यामुंबईमंत्री