शिक्षक घरी येणार, अॅडमिशन करून देणार; मार्च ते जूनदरम्यान शासनातर्फे जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:03 IST2026-03-31T12:03:14+5:302026-03-31T12:03:14+5:30
गुणवत्ता समाजासमोर आणण्यासाठी उपक्रम

शिक्षक घरी येणार, अॅडमिशन करून देणार; मार्च ते जूनदरम्यान शासनातर्फे जनजागृती
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६५ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मार्च ते जून या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहेत.
या मोहिमेंतर्गत गाव आणि परिसरातील शाळाबाह्य तसेच दाखलपात्र मुलांचे सर्वेक्षण करून प्रत्येक मुलाचा शाळेत प्रवेश निश्चित केला जाणार आहे. पत्रके, फलक, प्रभातफेरी आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व घराघरात पोहोचवले जाणार आहे. शाळांची साफसफाई, रंगरंगोटी, शैक्षणिक वातावरण निर्मिती तसेच शिक्षक-पालक बैठका घेऊन नवीन वर्षासाठी शाळा सज्ज करण्यात येणार आहेत. 'शाळा आपल्या दारी' उपक्रमांतर्गत शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गृहभेटी घेऊन पालकांशी संवाद साधतील. पालक मेळावे, अंगणवाडी-शाळा समन्वय, माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा आणि 'गुढीपाडवा, पट वाढता' अभियानाद्वारे प्रवेश वाढवण्यावर भर जाणार आहे.
लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामपंचायत यांचा सहभाग घेऊन शैक्षणिक ग्रामसभा आयोजित केली जाणार आहे.
गुणवत्ता समाजासमोर आणण्यासाठी उपक्रम
शिष्यवृत्ती, नवोदय, नॅशनल मेरीट कम बेसिस स्कॉलरशिप परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे बॅनर, व्हिडीओ आणि प्रवेशगीतांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता समाजासमोर मांडली जाणार आहे.
'शाळा प्रवेशोत्सव' अंतर्गत नवीन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले जाईल. या मोहिमेमुळे शासकीय शाळांमधील प्रवेशसंख्या आणि लोकसहभागात वाढ होईल. शासनाने १३ सदस्यांची समिती स्थापन करून उपक्रमांना सर्व गावात पोहचविण्याचे निश्चित केले आहे. शरद गोसावी, संचालक, शिक्षण विभाग