Join us  

छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांची नावं घेतल्याने भाजपाच्या पोटात का दुखलं?- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 3:58 PM

भाजपाने सुप्रीम कोर्टाचे आदेश, नियमांची पायमल्ली होत असलेल्या सभागृहात आम्ही बसणार नसल्याचे सांगत सभात्याग केल्याने विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शून्य मतदान झाले.

मुंबई: भाजपाने सुप्रीम कोर्टाचे आदेश, नियमांची पायमल्ली होत असलेल्या सभागृहात आम्ही बसणार नसल्याचे सांगत सभात्याग केल्याने विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शून्य मतदान झाले. भाजपाने केलेल्या आरोपावर शपथविधीवेळी मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांची नावं घेतली, मग देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पोटात का दुखलं असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील आम्ही आमच्या दैवतांची नावं घेतली, त्यानंतर राज्यपालांनी दिलेली शपथ जशीच्या तशी वाचली. त्यामुळे भाजपाने केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जनतेने मजबूत विरोधी पक्ष दिला आहे. मात्र त्यांनी विरोध न करता सभागृह बाहेर निघून गेल्याचे देखील छगन भुजबळ यांनी सभागृहाच्या भाषणात सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्र्यांनी घेतलेली शपथ अवैध आहे. शपथ घेताना एक मसूदा असतो. राज्यपालांनी मी म्हटल्यानंतर मंत्र्यांनी अनेक नेत्यांची नावे घेतली. पहिल्यांदाच हंगामी अध्यक्ष बदलण्याचा नियमबाह्य काम केले. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासात आजपर्यंत विधानसभा अध्यक्षाची निवड होत नाही तोपर्यंत विश्वासदर्शक ठराव मांडता येत नाही असं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच सुप्रीम कोर्टाचे आदेश व  नियमांची पायमल्ली होत असलेल्या सभागृहात आम्ही बसणार नसल्याचे सांगत भाजपाने सभात्याग करण्याचा निर्णय घेतला होता.

अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनात आधी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सदस्य यांचा परिचय झाला. भाजपा आमदारांकडून सभागृहात गदारोळ केला व त्यानंतर भाजपाने सभात्याग करत विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार टाकला.  

सरकारवरील विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडण्यासाठी आज विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडीने बहुमत ठराव जिंकला. 169 आमदारांचा सरकारच्या बाजूने मतदान केले. तसेच मनसे, एमआयएम आणि सीपीआयएम यांचे एकूण चार आमदार तटस्थ राहीले आहेत. तर भाजपाने सभात्याग केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना- राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारची शनिवारी (30 नोव्हेंबर) शक्तिपरीक्षा होती. या बहुमत चाचणीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पास झाले आहेत.

टॅग्स :जयंत पाटीलदेवेंद्र फडणवीसछगन भुजबळराष्ट्रवादी काँग्रेसउद्धव ठाकरेशिवसेना