Join us  

Maharashtra Government: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, शिवसैनिकच मुख्यमंत्री असेल - संजय राऊत 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 10:46 AM

राज्यात लवकरच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं महाविकासआघाडीचं नवं सरकार सत्तेवर येण्याची चिन्हे आहेत.

मुंबईः राज्यात लवकरच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं महाविकासआघाडीचं नवं सरकार सत्तेवर येण्याची चिन्हे आहेत. तिन्ही पक्षांचं किमान समान कार्यक्रमावर एकमत झालं असून, आता अंतिम चर्चा करून तिन्ही पक्ष मिळून सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू आहे. या तिन्ही पक्षांना सत्ता स्थापन करण्यासाठी 6 महिन्यांचा अवधी आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत ही शिवसैनिकांची इच्छा आहे. तसेच महाआघाडीच्या सरकारचं नेतृत्व हे उद्धव ठाकरेंनीच करावं, असं तिन्ही पक्षांचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंच्या नावाला तिन्ही पक्षांनी सहमती दिलेली आहे, असा खुलासाही राऊतांनी केला आहे. 

दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात जो फॉर्म्युला तयार झाला आहे, त्यात दोन प्रस्ताव असून, ते शिवसेनेसमोर ठेवण्यात येणार आहेत. एका फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 15 मंत्रिपदे मिळतील आणि राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या वाट्याला प्रत्येकी उपमुख्यमंत्रिपदासह अनुक्रमे 15 व 13 मंत्रिपदे येतील. दुसऱ्या प्रस्तावात शिवसेनेचा मुख्यमंत्री, काँग्रेस व राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद आणि तिन्ही पक्षांचे प्रत्येकी 14 मंत्री असा उल्लेख आहे.तिन्ही पक्षांना समान मंत्रिपदाची मागणी शिवसेनेने मान्य न केल्यास महत्त्वाची खाती मिळावीत, असा या पक्षांचा आग्रह असेल. राष्ट्रवादीला गृह, अर्थ ही खाती हवी असून, महसूल व ग्रामीण विकास ही खाती आपल्याला मिळावीत, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. नगरविकास खाते शिवसेनेला देण्यास दोन्ही पक्षांची तयारी आहे. त्यामुळे समान मंत्रिपदे घ्यायची की काँग्रेस-राष्ट्रवादीला महत्त्वाची खाती द्यायची, हा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019संजय राऊतशिवसेना