Maharashtra Flood: पूरग्रस्तांच्या मदतीला धावला मुंबईचा बाप्पा; लालबागच्या राजाकडून 25 लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 18:01 IST2019-08-14T17:30:36+5:302019-08-14T18:01:15+5:30
अन्य गणपती मंडळांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी दिला आहे.

Maharashtra Flood: पूरग्रस्तांच्या मदतीला धावला मुंबईचा बाप्पा; लालबागच्या राजाकडून 25 लाखांची मदत
मुंबई - पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले असून मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा मंडळाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 25 लाख रुपयांची मदत केली आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला आहे.
तर दुसरीकडे अन्य गणपती मंडळांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी दिला आहे. लालबागमधील गणेशगल्ली मुंबईच्या राजाकडून 3 लाखांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. आणि चिंचपोकळीतील चिंतामणी गणपती मंडळातून मुख्यमंत्र्यांना 5 लाखांचा निधी देण्यात आला आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महाराष्ट्रात आलेल्या महापूरामुळे कराव्या लागणार्या पुनर्वसानासाठी २५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता नीधीला दिले. मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत २५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. pic.twitter.com/2ucuR2E6za
— Lalbaugcha Raja (@LalbaugchaRaja) August 14, 2019
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईत गणपती आगमनाची लगबग सुरु झाली आहे. आज सह्याद्री अतिथी गृहात मुख्यमंत्र्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली यात गणेशोत्सवाचे स्वरूप हे उत्साही राहिले पाहिजे. त्यामुळे गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. गणेश मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी तसेच कायदा सुरक्षेच्या दृष्टिने योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सार्वजनिक उत्सव मंडळ आणि धर्मादाय संस्था, विश्वस्त मंडळाच्या नोंदणीसाठी अत्याधुनिक प्रणाली सुरू करण्यात येईल. पासपोर्टसाठी ज्या पद्धतीने आता सुटसुटीतपणे आणि सहजपणे अर्ज, नोंदणी करता येते,त्याच पद्धतीने ही प्रक्रिया असेल. ऑनलाईन प्रणाली असेल, त्यामुळे कुठल्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. गणेशोत्सव समन्वय समिती आणि गणेशोत्सव महासंघानी सूचविलेल्या सूचनांवर उचित निर्णय घेण्यात येईल.
पोलिसांनी आगमन व विसर्जन मिरवणुकीत वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित करावे. तसेच पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्यासंदर्भात पोलिसांनी योग्य ती भूमिका घ्यावी. गणेशोत्सव काळात जास्तीत जास्त बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यासाठी प्रयत्न करू,असेही फडणवीस यांनी सांगितले.