Join us  

आमदार फुटीची भाजपालाही भीती, समर्थक अपक्ष आमदारांना गुजरातला हलवले 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 12:14 AM

विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसे संख्याबळ पाठीशी असल्याबाबत साशंकता असल्याने भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत.

मुंबई - अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या जोरावर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने राज्यात सरकार स्थापन केले होते. मात्र विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसे संख्याबळ पाठीशी असल्याबाबत साशंकता असल्याने भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, आमचा आमच्या आमदारांवर पूर्ण विश्वास आहे. असा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. मात्र बहुमताचे गणित जुळवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या अपक्ष आमदारांना सोबत ठेवण्यासाठी भाजपाने या आमदारांना शनिवारीच गुजरातला हलवले आहे. बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी होणाऱ्या संभाव्य फोडाफोडीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये हलवले आहे. दरम्यान, आम्हाला आमच्या आमदारांवर विश्वास असल्याने त्यांना बंदिस्त करून ठेवण्याची गरज नाही, असा दावा भाजपा नेते वारंवार करत आहे. पण भाजपाला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांना मात्र भाजपाने शनिवार पासून गुजरातला मध्ये ठेवले आहे.  दरम्यान,  राज्यातील राजकीय घडामोडीवर युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आणि आमदार रवि राणा यांनी मोठे विधान केले होते. भाजपाचेच सरकार स्थापन होईल आणि जवळपास 170 आमदारांच्या पाठिंब्यावर हे सरकार बहुमत चाचणीत यशस्वी होईल, असा दावाही रवि राणा यांनी केलाय. रवि राणा यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय घडामोडींमध्ये ट्विस्ट पहायला मिळत आहे. भाजपासोबत 175 पेक्षा अधिक आमदार आहेत. सध्या शिवसेनेतील घडामोडीमुळे ही संख्या आणखीन वाढेल, असा आशावादही राणा यांनी बोलून दाखवला होता. 

टॅग्स :भाजपाआमदारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019राजकारण