Maharashtra Vidhan Sabha: महाराष्ट्र हे आता आत्महत्येचं डेस्टिनेशन होतंय का?, फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 15:45 IST2021-03-09T15:44:07+5:302021-03-09T15:45:37+5:30
Devendra fadnavis On Aditya thackeray: राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आत्महत्यांवरुन साधला आदित्य ठाकरेंवर निशाणा

Maharashtra Vidhan Sabha: महाराष्ट्र हे आता आत्महत्येचं डेस्टिनेशन होतंय का?, फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
रायपूर येथील सरकारी अधिकाऱ्यानं नागपूरात येऊन केलेली आत्महत्या आणि दादरा नगर हवेलीचा भाजप खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत केलेल्या आत्महत्येवरुन राज्याच्या विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. भाजपचं प्रशासन असलेल्या राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन आत्महत्या करत आहेत आणि महाराष्ट्र सरकारकडून न्याय मिळेल या आशेनं आरोपींवर कारवाई करण्याची मागणी सुसाईड नोटमध्ये करत आहेत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं. यावेळी अनिल देशमुख यांनी रायपूर मध्य प्रदेशात येत असल्याचा उल्लेख केला. देशमुखांच्या याच दावाच्या धागा पकडून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार शरसंधान केलं आहे.
"राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची माहिती करुन घ्यावी की रायपूर हे मध्य प्रदेशात नव्हे, तर छत्तीसगडमध्ये येतं आणि तिथं काँग्रेसचं सरकार आहे. महाराष्ट्रात येऊन लोक आत्महत्या करत आहेत याची खुशी गृहमंत्र्यांना होत असेल तर हा महाराष्ट्र आता पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का? याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी द्यावी", असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
सचिन वाझे प्रकरणावरुन अभूतपूर्व गोंधळ
मनसुख हिरेन प्रकरणात भाजपकडून आरोप करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना तातडीनं निलंबित करण्याची मागणी विरोधीपक्षानं यावेळी लावून धरली. सचिन वाझे यांना सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा तक्रार अर्जच यावेळी फडणवीस यांनी सभागृहात वाचून दाखवला. तक्रार अर्जाचा हवाला देत फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांचा खूप सचिन वाझे यांनी केला असावा, असा दावाच सभागृहात केला आहे.