Join us  

आषाढी एकादशी : मधुकर रामदास जोशी यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 6:18 PM

मधुकर जोशी हे  संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक आहेत. या विषयावर ते लेखन करीत आहेत.

ठळक मुद्देमधुकर जोशी हे  संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक आहेत.या विषयावर ते लेखन करीत आहेत. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक म.रा.जोशी यांना घोषित करण्यात आला.

मुंबई : राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१८-१९ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक म.रा.जोशी यांना घोषित करण्यात आला. रुपये ५ लक्ष रोख,  मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप असून आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक कार्य मंत्री  विनोद तावडे यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली.

मधुकर जोशी हे  संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक आहेत.या विषयावर ते लेखन करीत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्राध्यापक म्हणून नागपूर विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. नागपूर विद्यापीठामध्ये मराठी साहित्याचा ज्ञानकोषचे ते संपादक आहेत. तुकाराम महाराजांच्या एक हजार पृष्ठांच्या गाथेचे त्यांनी संपादन केले आहे. प्राचीन मराठी संत वाडमय आणि साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. पीएच.डी आणि एम.फिलचे परिक्षक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. मराठी बोर्ड ऑफ स्टडी जबलपूर, नागपूर आणि उजैन अभ्यास मंडळावर त्यांनी सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते. जोशी संत साहित्य विषयाचे पीएच.डी चे मार्गदर्शक आहेत. त्यांचे २०० हून अधिक लेख एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइजम कडून प्रकाशित करण्यात आले आहेत. सार्थ तुकाराम गाथेची  ४००हस्तलिखिते  तपासून प्रसिद्ध केली आहेत. नाथ सांप्रदाय, ज्ञानेश्वरी संशोधन, गुलाबराव महाराज समकालीन साहित्य, दत्त गुरुचे दोन अवतार, मनोहर आम्बानगरी, श्री विठ्ठल आणि पंढरपूर, समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. सध्या ते तंजावर येथील ३,५०० मराठी हस्तिलिकाहीखितांचे संशोधन करत आहेत. मधुकर रामदास जोशी यांना हा पुरस्कार लवकरच सन्मानपूर्वकप्रदान करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.

संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणा-या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ.दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लवितकर, यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, मारोती महाराज कुऱ्हेकर आणि डॉ.उषा देशमुख, ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते आणि डॉ. किसन महाराज साखरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीमधील डॉ.प्रशांत सुरु, डॉ.सिसिलिया कार्व्हालो,  भास्करराव आव्हाड या सदस्यांनी सदर निवड केली.

टॅग्स :विनोद तावडेपंढरपूरसाहित्यआषाढी एकादशीपंढरपूर वारी