CSMT रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ अखेर लागले बॅगेज स्कॅनर! प्रवाशांनी व्यक्त केले समाधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 14:04 IST2025-06-03T14:01:28+5:302025-06-03T14:04:05+5:30
आणखी स्कॅनरसाठी निविदा अंतिम टप्प्यात

CSMT रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ अखेर लागले बॅगेज स्कॅनर! प्रवाशांनी व्यक्त केले समाधान
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मध्य रेल्वेच्याछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची (सीएसएमटी) सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून, नवीन एक्स रे बॅगेज स्कॅनर बसविले आहेत. सीएसएमटीमध्ये बॅगेज आणि बॉडी स्कॅनर बंद असल्याने सुरक्षेबाबत ‘लोकमत’ने अनेकदा प्रश्न उपस्थित केला होता. त्याची दाखल घेत आता प्रशासनाने टर्मिनसच्या मुख्य प्रवेशद्वारावर बॅगेज स्कॅनर बसविला आहे, तर आणखी स्कॅनर लवकरच बसविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि मुंबई शहरातील महत्त्वाचे स्थानक असलेल्या सीएसएमटीमध्ये दररोज १८०० उपनगरी लोकल आणि टर्मिनसवरून सुमारे २०० पेक्षा अधिक एक्स्प्रेस सुटतात. त्यामुळे या स्थानकातून दररोज सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त प्रवासी ये-जा करीत असतात. या स्थानकात येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी १५ पेक्षा अधिक मार्ग आहेत. त्यामुळे या स्थानकात आणि टर्मिनसवर सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या संख्येने बॉडी आणि बॅगेज स्कॅनर तसेच सुरक्षा रक्षक असणे अपेक्षित आहेत. त्यामुळे प्रशासनाने नवीन एक्स रे बॅगेज स्कॅनर बसविले आहेत.
आणखी स्कॅनरसाठी निविदा अंतिम टप्प्यात
मध्य रेल्वेने महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार सर्वसमावेशक बॅगेज स्कॅनर खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली असून, बोलीदारांची तांत्रिक पडताळणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या सहा महिन्यांमध्ये आणखी चार स्कॅनर मध्य रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकांवर लावण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे १.५ ते २ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
प्रवाशांनी व्यक्त केले समाधान
सीएसएमटीमधून नियमित एक्स्प्रेस पकडणाऱ्या शर्मिला राजे या प्रवाशांनी बॅगेज स्कॅनर बसविल्याबद्दल आनंद व्यक्त केला असून, प्रशासनाने प्रवासी सुरक्षेवर आणखी भर दिला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
बॉडी स्कॅनर कधी?
प्रशासनाने सीएसएमटीवर बॅगेज स्कॅनर बसविले असून, त्या माध्यमातून प्रवाशांच्या सामानाची तपासणी सुरू आहे. परंतु, प्रवाशांच्या माध्यमातून काही अनपेक्षित गोष्टीची वाहतूक झाल्यास त्याला अटकाव कसा करता येणार असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत असून, त्याचेदेखील नियोजन करावे असे त्यांचे म्हणणे आहे.