Lokmat Digital Creator Awards 2023 : लग्नाचा काय प्लॅन?; प्रश्न ऐकून आदित्य ठाकरे जरासे लाजले, चलाखीने दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 20:39 IST2023-02-22T20:38:47+5:302023-02-22T20:39:14+5:30
मुंबईत लोकमत तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'डिजिटल क्रिएटर्स अवॉर्ड'मध्ये आदित्य ठाकरे उपस्थित होते.

Lokmat Digital Creator Awards 2023 : लग्नाचा काय प्लॅन?; प्रश्न ऐकून आदित्य ठाकरे जरासे लाजले, चलाखीने दिलं उत्तर
शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर आमदार आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलं. मुंबईत लोकमत तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'डिजिटल क्रिएटर्स अवॉर्ड'मध्ये आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा आणि लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. यावेळी त्यांनी लग्न कधी करणार या प्रश्नालाही थोड्या चलाखीनं उत्तर दिलं.
“हा प्रयत्न तुम्ही चार वर्षांपूर्वी केला होता आणि आताही करताय. सध्या फक्त राजकारणावर लक्ष केंद्रित करू,” असं आदित्य ठाकरे थोडं लाजत म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या आईविषयी विचाललेल प्रश्नाचंही उत्तर दिलं. “अशा अनेक गोष्टी असतात ज्या आईशी बोलता येतात. अशा अनेक गोष्टी असतात त्या वडिलांशी बोलता येतात. पण माझे पाय जमीनीवर राहावे यासाठी आईनं खूप मदत केलीये. हे खूप महत्त्वाचं आहे,” असं ते म्हणाले.
राजकीय परिस्थितीवरही भाष्य
“महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी मी त्यावेळी दावोसला गेलो होतो. माझ्या वडिलांनी एकनाथ शिंदे यांना बोलावलं होतं. माझ्या वडिलांच्या दोन सर्जरी झाल्या होत्या तेव्हा आम्ही ज्यांना आता गद्दार म्हणतो त्यांच्या मनात काही गोष्टी सुरू होत्या. पक्षातून फुटलो, मुख्यमंत्री बनण्याची संधी आहे का? असे विचार चालले होते. त्यांच्यावर मोठा दबावही होता. गावातही गेलो तरी लोक सांगतील की कोणते दबाव आपल्या देशात बनतात. त्यांना २० मे ला विचारलं होतं तुमच्या मनात काय आहे. तुम्ही बंडखोरीच्या विचारात आहात का विचारलं होतं. ही बंडखोरी नाही. हे झालंय ती गद्दारी आहे. पाठीत सुरा खुपसलाय. ज्यांनी स्वत:ला विकलं आहे त्यांना थांबवून काय करणार. ज्यांनी आपला आत्मा विकला आहे, त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा आहेत," असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला.
अजित पवारांवरही भाष्य
शिवसेनेचे आमदार म्हणायचे की, अजित पवार फक्त राष्ट्रवादीच्या आमदारांनाच फंड देतात? यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणतात, 'अजित पवारांनी सेशनमध्येच फंड दिल्याचा संपूर्ण लेखाजोखा मांडला होता. आमदारांना आमच्या काळात खूप फंड दिला. आता त्यांना विचारा, आता फंड नाही, आवाजही दाबला जातोय. हे सगळे आज ना उद्या निलंबित होणार. मी त्यांना आव्हान देतोय, राजीनामा द्या आणि निवडणूक लढा, जनता निर्णय घेईल. मी मुख्यमंत्र्यांनाही आव्हान दिलंय, वरळीतून लढा किंवा मी तुमच्या ठाण्यातून लढतो. पण, निवडणूक घेण्याची यांच्यात हिम्मत नाही,' अशी टीकाही आदित्य यांनी केली.