मुंबई : सोशल इंजिनियरिंग डोळ्यासमोर ठेवून उमेदवाराची निवड करा. दिल्ली वा मुंबईवरून उमेदवार लादू नका, स्थानिक नेते एकमताने ठरवतील त्यांनाच उमेदवारी द्या आणि नावे लवकरात लवकर निश्चित करा, अशी आग्रही मागणी राज्यभरातून आलेल्या काँग्रेस नेत्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी दादर येथील टिळक भवनात काँग्रेसच्या विभागनिहाय बैठकांना गुरुवारपासून सुरुवात झाली. गुरुवारी विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्टÑातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. शुक्रवारी मुंबई, ठाणे या जिल्ह्यांची चर्चा होईल. बहुजन वंचित आघाडी सोबत येणार नसेल, तर पक्षातील सुशीलकुमार शिंदे, शरद रणपीसे, एकनाथ गायकवाड, जयवंत आवळे या ज्येष्ठ दलित नेत्यांनी विधानसभेला सामोरे गेले पाहिजे. तसेच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवून काँग्रेसने निवडणूक मैदानात उतरले पाहिजे, अशी आग्रही मागणी आ. अमित देशमुख यांनी केली. ते म्हणाले, भाजपकडून देवेंद्र फडणवीस, शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील. त्यामुळे काँग्रेसनेही स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याने नाव मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे. त्याला लातूर, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, सांगली या जिल्ह्यातून आलेल्या नेत्यांनीही जोरदार समर्थन दिले.बैठकीस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, नाना पटोले, हर्षवर्धन पाटील, नसीम खान, आशिष दुआ, चेल्ला वामशी रेड्डी, भी. एम. संदीप, संपतकुमार, जयवंत आवळे, बसवराज पाटील, खा. हुसेन दलवाई, कृपाशंकर सिंह, आ. शरद रणपिसे, एकनाथ गायकवाड, आ. के. सी. पाडवी आदी उपस्थित होते.
राष्टÑवादीने घेतला मुंबई व कोकणचा आढावाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, अजित पवार आदी नेत्यांनी मुंबईसह कोकण विभागातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. मुंबई, वसई, विरार, पालघर, रत्नागिरी, पनवेल शहर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, मिराभाईंदर, ठाणे ग्रामीण, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई या ठिकाणी कोण इच्छुक आहे, कोणाची किती ताकद आहे, काँग्रेसमधून कोण इच्छूक आहे, यावर चर्चा झाली.