Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाचाळवीरांना आवरा...; मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावर अजित पवारांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 20:44 IST

गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका विधानामुळे राज्यात वाद पेटला आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका विधानामुळे राज्यात वाद पेटला आहे, आज शिवप्रतापदिन सोहळ्यात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.  'वाचाळवीरांना आवरा असं मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कित्येकवेळा सांगितले आहे. तरीही ही लोक हीच चूक करत आहेत. बोलायला एक जातात एक बोलतात एक, एकनाथ शिंदे ज्या व्यासपीठावर होते त्याच व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जाते. 

याअगोदर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशी केलेली नाही, पण असं सध्या घडत आहे. असंही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. 

मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

मंत्री मंगलप्रभात लोढा नेमकं काय म्हणाले?

लोढा यांनी एकनाथ शिंदे यांनी शिवेसेनेमध्ये केलेल्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्य्रामधून औरंगजेबाच्या तावडीतून करवून घेतलेल्या बंडाशी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. 

आज सातारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे शिवप्रताप दिन सोहळ्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी उपस्थितांना संबोधिक करताना मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाची तुलना शिवरायांना आग्य्रातून करून घेतलेल्या सुटकेशी केली. यावेळी लोढा म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्य्रातील किल्ल्यात ठेवले होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी आग्य्रातून नाट्यमयरीत्या सुटका करून घेतली होती. ते तिथून सुटून बाहेर आले त्यामुळेच ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. त्याचप्रकारे एकनाथ शिंदे यांना रोखण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र एकनाथ शिंदे बाहेर पडले, असे विधान मंगलप्रभात लोढा यांनी केले होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

लोढा यांनी एकनाथ शिंदे यांनी शिवेसेनेमध्ये केलेल्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्य्रामधून औरंगजेबाच्या तावडीतून करवून घेतलेल्या बंडाशी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

 "मंगलप्रभात लोढा यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो त्यांनी प्रतापगडासाठी २५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

टॅग्स :अजित पवारमंगलप्रभात लोढाएकनाथ शिंदे