लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:48 IST2025-09-25T18:43:53+5:302025-09-25T18:48:17+5:30
Lalbaug Raja Ganeshotsav Mandal: मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढण्याऱ्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम आहे.

लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
Lalbaug Raja Ganeshotsav Mandal: महापुरामुळे अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी आणि लोकांना धीर देण्यासाठी सरकारच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील उजनी, औराद शहाजानी, सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना येथे नुकसानाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माढा तालुक्यात तर एकनाथ शिंदे यांनी भूम परांडा भागात आपत्तीग्रस्तांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले. यातच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शेतकरी, पूरग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.
अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत मदतीचा हात देण्यात येत आहे. अजित पवार गटाचे सर्व आमदार-खासदार, शिंदेसेनेचे सर्व मंत्री, आमदार तसेच भाजपचे आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन जमा करणार आहेत. तसेच दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देण्याचा राजपत्रित अधिकारी महासंघाचा निर्णय समोर आला आहेत. तसेच बहुतांश सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी एक दिवसाचे निवृत्तीवेतन देण्याचा मनोदय व्यक्त केला.
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
मराठवाड्यात जो आलेला महाप्रलय आहे, मराठवाड्यात जे अस्मानी संकट आले आहे. सातत्याने दोन ते तीन दिवस झालेला प्रचंड पावसामुळे अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. मोठ्या ओल्या दुष्काळाला शेतकरी, नागरिक सामोरे जात आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ५० लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन लवकरच या रकमेचा धनादेश सुपूर्द करणार आहोत, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढण्याऱ्या पावसाने बुधवारी काहीसा दिलासा दिला असला तरी अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी विविध जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. यावेळी अनेकांनी चिखल झालेली पिके दाखवत आपल्या व्यथा मांडल्या. अजुनही अनेक गावांना पुराचा वेढा असून पिकांसह घरांमध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहे.