१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे
By धीरज परब | Updated: June 13, 2025 22:50 IST2025-06-13T22:50:29+5:302025-06-13T22:50:55+5:30
मेट्रो कारशेडसाठी मौजे डोंगरी येथील सरकारी व खाजगी जमीन असलेल्या डोंगरावर जागा निवडली आहे. कारशेडसाठी १२ हजार ४०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे.

१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदरच्या डोंगरी येथील डोंगरावर १२ हजार ४०० झाडे व स्थानिकांची घरे तोडण्या ऐवजी मेट्रोच्या शेवटच्या स्थानका जवळील अन्य पर्यायी मोकळ्या जागांचा विचार करावा असे साकडे स्थानिक भाजपा नेते ऍड. रवी व्यास यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले आहे. मोकळ्या जागांच्या पर्याया मुळे वाढीव खर्च टळेल, झाडे वाचून पर्यावरणाचे संरक्षण होईल व जनभावनेचा आदर राखला जाईल अशी भूमिका व्यास यांनी व्यक्त केली आहे.
मेट्रो कारशेडसाठी मौजे डोंगरी येथील सरकारी व खाजगी जमीन असलेल्या डोंगरावर जागा निवडली आहे. कारशेडसाठी १२ हजार ४०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे. स्थानिक ग्रामस्थांसह शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, मच्छीमार संघटना, शेतकरी संस्था आदींनी मोठ्या प्रमाणात १२ हजार ४०० झाडे तोडण्यास विरोध करत सुमारे २० हजार नागरिकांनी हरकत घेतली आहे.
एमएमआरडीएने ह्या आधी राई, मुर्धा, मोरवा ह्या गावाच्या मागील मोकळ्या जागेत कारशेड आरक्षण टाकले होते. काही स्थानिक अडचणी मुळे आरक्षण रद्द केले. परंतु आता मेट्रो मार्गिका हि मुर्धा - राई - मोरवा गावांच्या मागून डीपी रोड विकसित करून मोकळ्या - ओसाड जागेतून जाणार असल्याने मोकळ्या जमिनीवर कारशेड उभारण्याचा पर्याय आहे.
सुभाषचंद्र बोस मैदान मेट्रो स्थानकच्या शेजारी मीरारोड पश्चिमेस मीरा इस्टेटची सुमारे ४०० ते ५०० एकर जागा मोकळी ओसाड असून तेथे कारशेड उभारल्यास १२ हजार ४०० झाडे वाचवता येतील, डोंगर फोडणे व सपाटीकरणक टळेल आणि खर्च वाचेल, कोणते घर बाधित होणार नाही, स्थानिक जनतेचा विरोध कमी होईल, वनक्षेत्र बाधित होणार नाही आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. कामाचा वाढीव खर्च टळेल. मेट्रो स्टेशन पासून कारशेड जवळ असल्याने कायमस्वरूपी खर्च व वेळ वाचून कामकाज सुलभ होईल असे ऍड. रवी व्यास यांनी निवेदनात म्हटले आहे. मीरा भाईंदर शहरासाठी आपल्या दूरदृष्टी नेतृत्वा मुळे मेट्रो उपलब्ध होत असून त्याचा नागरिकांना खूप चांगला फायदा होईल त्या बद्दल व्यास यांनी मुख्यमंत्री यांचे आभार देखील पत्रात मानले आहेत.