पंतप्रधान मोदी नसते, तर राम मंदिर झालेच नसते - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 07:18 IST2024-04-14T07:17:08+5:302024-04-14T07:18:31+5:30
राज ठाकरे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांना सुनावले

पंतप्रधान मोदी नसते, तर राम मंदिर झालेच नसते - राज ठाकरे
लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते, तर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला नसता. अनेक प्रलंबित कामांप्रमाणे राम मंदिराचे कामही प्रलंबित राहिले असते, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
लोकसभा निवडणुकीत पक्षाचा विचार करूनच मोदी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्यामुळे ज्यांना समज आणि उमज नसेल अशांनी त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्यावा, असेही त्यांनी नाराज पदाधिकाऱ्यांना सुनावले. २०१४ ते २०१९ या काळात मी मोदी सरकारवर जी टीका केली ती मुद्द्यांवरची होती. गेल्या पाच वर्षांत ज्या चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या, त्याचे कौतुक देखील मी केल. रोजगार, मराठी भाषेला अभिजात दर्जा असे अनेक विषय मोदी मार्गी लावतील, असेही राज ठाकरे म्हणाले.
दोन जागांची ऑफर
- राज ठाकरे यांना महायुतीकडून दोन जागांची ऑफर देण्यात आली. यामध्ये मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ आणि राज्यसभेच्या जागेचाही समावेश होता.
- मात्र, राज यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता पाठिंबा दिला असल्याचे सांगताना, पाठिंबा दिला म्हणजे दिला, असे महायुतीतील नेत्यांना सांगितल्याचे मनसे नेत्याकडून सांगण्यात आले.