Bhayyuji Maharaj Suicide: 'ते थकले होते, पण असं पाऊल उचलतील याची कल्पनाच आली नाही'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 15:28 IST2018-06-12T15:23:31+5:302018-06-12T15:28:30+5:30
राजकारणात अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जायचे.

Bhayyuji Maharaj Suicide: 'ते थकले होते, पण असं पाऊल उचलतील याची कल्पनाच आली नाही'
मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये भय्युजी महाराज थकले होते. मात्र, ते इतक्या टोकाचे पाऊल उचलतील, ही कल्पनाच कधी केली नव्हती, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते माधव भंडारी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या राजकारणात भय्यूजी महाराजांचा बराच बोलबाला होता. राजकारणात अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जायचे. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भय्युजी महाराजांविषयी बोलताना माधव भंडारी यांनी सांगितले की, माझा आणि भय्युजी महाराजांचा अनेक वर्षांचा स्नेहसंबंध होता. साधारण महिनाभरापूर्वीच आमची भेट झाली होती. तेव्हा ते काहीसे थकल्यासारखे वाटत होते. मात्र, ते इतक्या टोकाचे पाऊल उचलतील, असे वाटले नव्हते. त्यावेळी आम्ही फक्त 15 मिनिटांसाठी एकमेकांशी बोललो. त्यांनी मला इंदूरला येण्याचे आमंत्रणही दिले होते, असे भंडारी यांनी सांगितले. भय्युजी महाराजांनी दुष्काळी भागात जलसंधारण आणि शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी खूप मदत केली. ते लोकांशी अत्यंत सौजन्याने वागत. त्यामुळे अनेक लोकांना ते आपले वाटत होते, असेही भंडारी यांनी सांगितले.