लोकल चालते कशी? हे जगासाठी आश्चर्यच; राज ठाकरे : परप्रांतांमधून आदळणारे लोंढेच जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:35 IST2025-06-10T10:35:14+5:302025-06-10T10:35:54+5:30
मुंबईची लोकल चालते कशी, हे जगाला आश्चर्यच असल्याचे उपरोधिकपणे सांगत त्यांनी राज-उद्धव एकत्र कधी येणार, या बातम्यांऐवजी या दुरवस्थेकडे थोडे लक्ष द्या, असे सुनावले.

लोकल चालते कशी? हे जगासाठी आश्चर्यच; राज ठाकरे : परप्रांतांमधून आदळणारे लोंढेच जबाबदार
मुंबई/पुणे : पक्षीय बैठकीसाठी म्हणून सोमवारी पुण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मुंब्रा येथे आजच सकाळी झालेल्या लोकल अपघातावरून रेल्वे प्रशासन, रेल्वे मंत्रालय यांच्याबरोबरच पत्रकारांवरही टीकास्त्र सोडले. परप्रांतांमधून मुुंबईत जोरात येऊन आदळणारे लोंढेच सगळ्या दुरवस्थेला जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. रेल्वे प्रशासन, रेल्वे मंत्रालय व पत्रकारांवरही त्यांनी जोरदार टीका केली.
लष्कराच्या ऑर्डर्सना ‘स्वदेशी’ने उशीर; परदेशी कच्चा मालही लवकर मिळेना
मुंबईची लोकल चालते कशी, हे जगाला आश्चर्यच असल्याचे उपरोधिकपणे सांगत त्यांनी राज-उद्धव एकत्र कधी येणार, या बातम्यांऐवजी या दुरवस्थेकडे थोडे लक्ष द्या, असे सुनावले. आपण वारंवार शहराच्या दुरवस्थेविषयी बोलतो, मात्र त्याला कधीही महत्त्व दिले जात नाही. आम्ही एकत्र कधी येणार या बातम्यांना जेवढा वेळ दिला, तेवढा वेळ आता यात मृत्युमुखी पडलेल्यांना देणार का? असा प्रश्न राज यांनी केला.
रेल्वेचा बोजवारा उडाला आहे. मुंबईत लोकलमध्ये लोक येतात कुठून, जातात कुठून काहीही कळत नाही. याची व्यवस्था लावण्यासाठी मुंबईतील लोकांनी रेल्वे मंत्रालयाला एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करा असे सांगितले होते, त्याचे काय झाले?
शहरांचे नियोजन नावाची गोष्टच आपल्याकडे नसल्याबाबतही मी अनेकदा बोलतो, मात्र त्याला महत्त्व दिले जात नाही. प्रश्न वेगळेच आहेत. मुंबईत एकही दिवस असा जात नाही की रेल्वेचा अपघात झाला नाही. अपघात झाला की रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो. राजीनामा कसला देताय, तिथे जा, बघा काय झालेय. ते सुधारा, पण ते होतच नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचे उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्त्वाच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.
शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री
हे तर सरकारने घेतलेले बळी आहेत. मुंबईतील पायाभूत सुविधा वाढवून मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार, अशा प्रकारच्या गप्पा जनता गेल्या ११ वर्षांपासून ऐकत आहे. सुविधा आणि विकासाच्या नावाखाली टेंडर द्या आणि कमिशन घ्या हा खेळ महाराष्ट्रात सुरू आहे. सरकारने आता तरी जागे होऊन, इव्हेंटबाजी सोडून मुंबईकरांचे जीव जाऊ नयेत यासाठी तातडीने पावले उचलावीत.
हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस