Join us  

हिंदुत्त्व म्हणजे पेटंट कंपनी नाही, उद्धव ठाकरेंनी सांगितली खरी व्याख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 8:12 PM

जेव्हा देशावर संकट आलं, हिंदू असल्याचं सांगताना अनेकांना भिती वाटायची, तेव्हा गर्व से कहो हम हिंदू है... हा नारा शिवसेना प्रमुखांनी दिला.

ठळक मुद्दे जेव्हा देशावर संकट आलं, हिंदू असल्याचं सांगताना अनेकांना भिती वाटायची, तेव्हा गर्व से कहो हम हिंदू है... हा नारा शिवसेना प्रमुखांनी दिला.

मुंबई - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी सुरू केलेल्या शिवसेना पक्षाला आज 55 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फेसबुकद्वारे राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. भाषणाच्या सुरुवातीलाच हे भाषण करताना, समोर जल्लोष करणारे शिवसैनिक नसल्याने हा संवाद मला भाषण वाटत नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. उद्धव ठाकरेंनी आपल्या लाईव्ह संवादात स्वबळावर लढण्याचा नारा देणाऱ्यांना सुनावले. तसेच, हिंदुत्त्व म्हणजे काय हेही समजावून सांगितले. 

मुख्यमंत्र्यांची झूल बाजूला ठेवून, मी शिवसेना कुटुंबातील माता-भगिनींशी आणि बांधवांशी संवाद साधतोय. हे 55 वर्ष सर्वच शिवसैनिकांचं आहे. शिवसैनिकांच्या आुयष्यात तीन सण असतात. बाळासाहेबांचा जन्मदिवस 23 जानेवारी, शिवसेनेची स्थापना 19 जून आणि 13 ऑगस्ट मार्मिकचा वर्धापन असलेला दिवस, हे तीन दिवस सणासारखे असतात. शिवसेना गेल्या 55 वर्षांपासून संकटांचा सामना करेतय. मी आजही संकटाचा सामना करतोय, जो संकटांचा सामना करत नाही तो शिवसैनिक कसा?, असा प्रश्नच उद्धव ठाकरेंनी विचारला. 55 वर्षे ही साधीसुधी वाटचाल नाही, शिवसेना केवळ सत्तेसाठी लढली असती, तर शिवसेना टिकलीच नसती. शिवसेना आजही शिवसैनिकांच्या जोरावरच पुढे जात आहे. 

जेव्हा देशावर संकट आलं, हिंदू असल्याचं सांगताना अनेकांना भिती वाटायची, तेव्हा गर्व से कहो हम हिंदू है... हा नारा शिवसेना प्रमुखांनी दिला. त्या शिवसेना प्रमुखांची ही शिवसेना आहे. प्रांतीय शिवसेनेनं हिंदुत्त्वाचा अंगीकार केल्यावर ती इतरांसाठी धर्मांध झाली. म्हणजे, टीका करणारे हे टीका करणारच, तुम्ही टीकेची पर्वा करू नका. तुमच्या मनाला काय वाटतंय ते करा, मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी जरुर लढेल, हिंदुत्त्वासाठी लढायचं असेल तेव्हाही जरूर लढेल. पण, हिंदुत्त्व म्हणजे आमचं राष्ट्रीयत्व आहे. 

हिंदुत्व म्हणजे काय असतं शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसांना हिंदवी स्वराज्याची आठवण करुन दिली, त्यांच्या मनगटातील ताकदिची जाणीव करुन दिली, तेव्हा मराठी माणूस पेटून उठला. त्याच मराठी माणसांची ही शिवसेना आहे. मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी, हिंदुत्त्वासाठी मी नक्कीच लढेल. हिंदुत्व आमचा देशाभिमान आहे, त्यानंतर प्रादेशिक अस्मिता असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आपलं राजकारण सोडून देशावर प्रेम करणारा शिवसेनेएवढा दुसरा पक्ष नाही. हिंदुत्व म्हणजे पेटंट कंपनी नाही, हे माझचं म्हणजे हिंदुत्त्व नाही. हिंदुत्व म्हणजे आमचा श्वास आहे. आघाडी किती काळ टिकेल, हे पाहुया पुढे. 

अप्रत्यक्षपणे फडणवीसांवर केली टीका

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात नाव न घेता विरोधकांनाही लक्ष्य केलं. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा अप्रत्यक्ष समाचारही त्यांनी घेतला. गेल्या वर्षभरापासून आपण काय करतोय, हे आपलं कामचं बोलतंय. त्यामुळे, अनेकांना पोटदुखी होतेय, पोटात गोळा येतोय. सत्ता नसल्याने अनेकांचा जीव कासाविस होतोय, असे म्हणत नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. तसेच, त्यांच्या दु:खण्याला इलाज करायला मी डॉक्टर नाही. जेव्हा राजकीय औषध द्यायची गरज आहे, तेव्हा राजकीय औषध जरुर देईल, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.   ममता बॅनर्जींचं कौतुक

ममता बॅनर्जींसह पश्चिम बंगालच्या जनतेचं कौतुक करावं वाटतं, बंगालने आत्मबळ दाखवून दिलं. देशाला वंदे मातरम हा शब्दही पश्चिम बंगालनेच दिला. प्रादेशिक अस्मिता जपली पाहिजे हेच बंगालने दाखवून दिलं. 

भाजपा-शिवसेना वादावरही अप्रत्यक्ष टिपण्णी

मुंबईतील शिवेसना भवनावर मोर्चा काढल्यानंतर शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी झाली. त्यावरुनही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला. रक्तपात करणं ही शिवसेनेची ओळख नाही, पण मुद्दामून शिवसैनिकाला कुणी डिवचत असेल तर रक्तदान करणारीही शिवसेना आहे. कोरोना काळातही मी केलेल्या आवाहनास शिवसैनिकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यावेळी, शिवसैनिकांनी विचारलं नाही, ते रक्त कुणाला दिलं जातंय. ते रक्त माणुसकीला दिलं जातंय, हे शिवसैनिकाला माहितीय. 

स्वबळाचा नारा देणाऱ्यांना लगावला टोला

राजकारण सध्या वळत-वळत चाललंय. कोरोना काळात चाललेलं राजकारण हे विकृतीकरण आहे. सत्ताप्राप्ती माझ्यासाठी नव्हतं, पण जबाबदारी आल्याने ती स्विकारावी लागली. सध्याच्या परिस्थितीत राजकारण आणि निवडणुकांचा विचार करताल, तर लोकं जोड्यानं हाणतील, एकहाती सत्ता आणू म्हणणाऱ्यांना लोकं विचारतील, आमच्या पोटापाण्याचं काय, आमच्या रोजगाराचं काय?, असे ठाकरेंनी म्हटलं. आपला देश अस्वस्थतेकडे चालला आहे. सत्ता हवीय, सत्ता मिळेल, पण जनतेसाठी त्याचा उपयोग कसा करणार हे महत्त्वाचं आहे. निवडणुकांचा विचार बाजूला ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी आर्थिक संकटाचा विचार करायला हवा. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाहिंदूभाजपामुख्यमंत्री