Join us  

घरी राहा, सुरक्षित राहा! येत्या 48 तासांत मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 3:03 PM

पावसाचा जोर कायम असून, यात वाढ होणार आहे. येत्या 48 तासांत पाऊस आणखी वाढेल. परिणामी मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये. घरी राहावे, सुरक्षित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

मुंबई - मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी (3 जुलै) सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने येथील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. यानंतर आता येत्या 48 तासांत मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पावसाचा जोर कायम असून, यात वाढ होणार आहे. येत्या 48 तासांत पाऊस आणखी वाढेल. परिणामी मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये. घरी राहावे, सुरक्षित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

"भारतीय हवामान शास्त्र विभागाने पुढील 24 ते 48 तासांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यात मुंबईसह पश्चिम किनारपट्टीचा समावेश आहे. मुंबईत सकाळी 11.30 पर्यंत 15 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम किनारी अद्यापही ढग आहेत. येथे 48 तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. आता मुंबईत पाऊस कमी झाला आहे. मात्र पुन्हा तो सक्रीय होईल" अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.

3 जुलै रोजी मुंबई, रायगड, पुणे, सातारा आणि रत्नागिरीला रेड अलर्ट देण्यात आला आहे. येथे तुरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडेल. 4 जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, पुणे येथे अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसारच, शुक्रवारी पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने धुमाकूळ सुरू केला. पूर्व आणि पश्चिम उपनगरासह शहरात सुरू झालेल्या पावसाने दुपारपर्यंत जोर कायम ठेवल्याने कामासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना धडकी भरलीच. मुंबईतल्या सखल भागात नेहमीप्रमाणे पावसाचे पाणी साचल्याने येथील वाहतूक ठप्प झाली होती. या प्रामुख्याने माटुंगा येथील गांधी मार्केट आणि दादर येथील हिंदमाता परिसराचा समावेश होता. तर उर्वरित ठिकाणी पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण कमी असले तरी पावसाचा वेग आणि मारा कायम राहिल्याने मुंबईचा वेग नेहमीच्या तुलनेत कमी झाला होता.

जून महिना बऱ्यापैकी कोरडा गेला असतानाच जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. विशेषत: शुक्रवारसह शनिवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान खात्याने दिला. गुरुवारी मध्यरात्रीपासूनच मुंबईत पावसाने आपला मुक्काम ठोकण्यास सुरुवात केली. पहाटे पावसाचा जोर वाढू लागला. विशेषत: सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस दुपारचे 12 वाजले तरी धो धो कोसळतच होता. या वेळेत पावसाने शहरासह उपनगरात आपला जोर कायम ठेवल्याने शुक्रवारी सकाळी साडेवाजेपर्यंत मुंबईत 57 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी 8 ते 9 या वेळेत दक्षिण मुंबईत कुलाबा, नरिमन पॉइंट येथे 25 मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी 9 ते 10 या वेळेत मलबार हिल, मेमनवाडा, वरळी, दादर, भायखळा, हाजी अली, मुंबई सेंट्रल, धारावी, माटुंगा, कुर्ला, विलेपार्ले या बहुतांश ठिकाणी 40 मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : बापरे! क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट; अनेकांना कोरोनाची लागण, घटनेने खळबळ

रुग्णालयाचा निष्काळजीपणा! डॉक्टरने घरबसल्या VCवरून दिल्या सूचना, कंपाऊंडरने केलं डायलेसिस अन्...

CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; हादरवणारी आकडेवारी

"नातीने आजीचं नाक कापलं"; परेश रावल यांचा प्रियंका गांधींवर हल्लाबोल

CoronaVirus News : 'या' रुग्णांसाठी होम आयसोलेशन नाही; आरोग्य मंत्रालयाने बदलले नियम

 

टॅग्स :पाऊसमुंबईमहाराष्ट्र