जो चुका करतो, तोच शिकतो; गुरुत्वाकर्षणाच्या विधानावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 06:41 IST2019-09-14T01:09:21+5:302019-09-14T06:41:56+5:30
उपनगरी मार्गावरील सरकते जिने, पादचारी पूल, वाय-फाय, हरित स्थानके आदींचा लोकार्पण कार्यक्रम मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फलाट क्रमांक १८ वर आयोजित केला होता.

जो चुका करतो, तोच शिकतो; गुरुत्वाकर्षणाच्या विधानावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
मुंबई : ‘ज्याने कधी चूक केली नाही, त्याने कधी नवीन काही करण्याचा प्रयत्न केला नाही,’ असे म्हणत केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या वादग्रस्त विधानावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी ‘आइन्स्टाइन’ला गणिताची मदत झाली नाही, असे भाष्य गोयल यांनी नुकतेच चेन्नईतील कार्यक्रमात केले होते. या विधानाचा नेटकऱ्यांनी खरपूस समाचार घेतल्यानंतर, शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विविध प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यात गोयल यांनी आपल्या विधानावर सारवासारव केली. दरम्यान, गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन यांनी लावला आहे. थोड्या चुकीमुळे न्यूटनऐवजी आइन्स्टाइन म्हणालो, असे गोयल म्हणाले.
उपनगरी मार्गावरील सरकते जिने, पादचारी पूल, वाय-फाय, हरित स्थानके आदींचा लोकार्पण कार्यक्रम मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फलाट क्रमांक १८ वर आयोजित केला होता. यावेळी गोयल म्हणाले, चेन्नईमधील कार्यक्रमात बोलताना जीभ घसरली. यामुळे देशभरातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, मी ज्यांचे नाव घेतले, त्या आइन्स्टाइन यांनी सांगितले आहे की, जो चुका करतो, तोच शिकतो. चुका प्रत्येकाकडून होतात. यातून शिकले पाहिजे. चुका करण्यासाठी घाबरत नाही. मात्र, त्या सुधारण्यासाठी मी तत्पर आहे. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार मनोज कोटक, खासदार हुसेन दलवाई, आमदार राज पुरोहित, आमदार के. एस. अहलुवालिया, मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता, एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. खुराणा, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन, पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सुनील कुमार, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर आदी उपस्थित होते.
त्यानंतर केली विधानात दुरुस्ती
केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्याने डबल इंजिनाचे काम होत आहे. महाराष्ट्रात रेल्वेचे ४५ ते ५० टक्के काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम उत्तम आहे. मुख्यमंत्र्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस एकमेव आहेत, असे रेल्वेमंत्री म्हणाले. हे विधान खरे आहे का, अशीही विचारणा रेल्वे अधिकाऱ्यांकडे आणि गुगलकडे केली. त्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले की, वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे आहेत. त्यानंतर गोयल यांनी आपल्या विधानात दुरुस्ती केली.