Join us  

'सरकारने घटनापीठ स्थापन करुन 'सर्वोच्च' स्थगिती हटविण्याची मागणी करावी'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 10:57 PM

आम्ही मराठा समाजासोबत आहोत, मराठा समाजाचं आरक्षण बहाल करण्याकरता ज्या ज्या गोष्टी सरकार करेल, त्यास आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

ठळक मुद्देआम्ही मराठा समाजासोबत आहोत, मराठा समाजाचं आरक्षण बहाल करण्याकरता ज्या ज्या गोष्टी सरकार करेल, त्यास आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

मुंबई-  मराठा आरक्षण प्रकरणात सर्व पक्ष सोबत आहोत. यासाठी तज्ज्ञांशी संवाद सुरू असून आम्ही एक मार्ग, एक दिशा ठरवण्याच्याजवळ आलो आहोत. उद्या किंवा परवा याबद्दलचा निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी, आम्ही मराठा समाजासोबत आहोत, सरकारच्या निर्णयाला आमचा पाठिंबाच राहिल, असे देवेद्र फडणवीस यांनी म्हटले.  

सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यावेळी, आम्ही मराठा समाजासोबत आहोत, मराठा समाजाचं आरक्षण बहाल करण्याकरता ज्या ज्या गोष्टी सरकार करेल, त्यास आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आम्ही यात कुठही राजकारण आणणार नाही. सरकार कुठे चुकत असेल तर सरकारला सांगू, पण पाठिंबा देऊ. जर, सरकारला वाटत असेल तर घटनापीठाकडे जावे, तर त्यासाठीही तत्काळ अर्ज करुन घटनापीठ स्थापित करुन आपण स्थगिती हटविण्याची मागणी केली पाहिजे. तसेच, इतर आरक्षणाच्या याचिकांसोबतच आमचीही अंतिम सुनावणी करा, अशी सरकारने भूमिका घेतली पाहिजे, तशी भूमिका सरकारची आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

सर्वपक्षीय बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण प्रकरणात सरकारला सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. 'सध्या मराठा समाजात भीतीचं वातावरण आहे. आम्ही राज्य सरकारला सहकार्य करणार आहोत,' असं फडणवीस म्हणाले. सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र ठाकरे सरकारच्या कार्यकाळात सारथी कमकुवत झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे, अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्री म्हणाले आंदोलन नको

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानंमराठा आरक्षणाचा विषय मोठ्या घटनापीठाकडे सोपवला. मात्र त्याचवेळी आरक्षणाला स्थगितीही दिली. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. यातून कायदेशीर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय सर्व पक्षांनी मिळून घेतला होता. आताही सगळे पक्ष मराठा समाजाच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. विरोधकांनीदेखील सरकारला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे,' असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. सर्व पक्ष तुमच्यासोबत आहेत. त्यामुळे आंदोलनं करू नका, असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. 

टॅग्स :मुंबईदेवेंद्र फडणवीसमराठा आरक्षणउद्धव ठाकरे