एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 06:47 IST2025-09-18T06:46:44+5:302025-09-18T06:47:23+5:30
१२ जून रोजी एअर इंडियाच्या अहमदाबाद ते लंडन या विमानाने उड्डाण केल्यावर काही क्षणातच अपघात झाला आणि या अपघातामध्ये २४१ प्रवाशांसह एकूण २६० लोकांचा मृत्यू झाला होता.

एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
मुंबई : एअर इंडियाच्या अपघात झालेल्या विमानाच्या चौकशीवर संबंधित विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या वडिलांनी आक्षेप घेतला असून, याप्रकरणी सरकारने पुढाकार घेत निष्पक्ष चौकशी करावी, तसेच या अपघातात मृत पावलेल्या माझ्या मुलावर कोणताही बट्टा नको, असे मत व्यक्त केले आहे.
१२ जून रोजी एअर इंडियाच्या अहमदाबाद ते लंडन या विमानाने उड्डाण केल्यावर काही क्षणातच अपघात झाला आणि या अपघातामध्ये २४१ प्रवाशांसह एकूण २६० लोकांचा मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल होते. या अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट ॲक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (एएआयबी) सुरू केली आहे. या चौकशीचे काही तपशील सध्या बाहेर येत आहेत आणि त्यामध्ये वैमानिकाकडे अंगुलीनिर्देश करण्यात येत आहे.
माझ्या मुलासंदर्भात चर्चा माझ्या कानावर येत आहे. त्यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास होत आहे. माझ्या मुलाच्या प्रतिमेला धक्का लावणे योग्य नाही.
पुष्कराज सभरवाल, दिवंगत कॅप्टन सुमित सभरवाल यांचे वडील