मित्र-मैत्रिणीला पत्र लिहा! पहिला नंबर आल्यास मिळणार ५० हजाराचं बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 09:58 IST2026-02-12T09:57:31+5:302026-02-12T09:58:01+5:30
पत्रलेखन स्पर्धेत पावणे दोन लाख नागरिकांचा सहभाग

मित्र-मैत्रिणीला पत्र लिहा! पहिला नंबर आल्यास मिळणार ५० हजाराचं बक्षीस
मुंबई - टपाल खात्याच्या ढाई आखर या राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील १ लाख ८३ हजार ४९ जणांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेचा मंडळ स्तरावरील निकाल २० फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह म्हणाले की, ‘ढाई आखर’ ही टपाल विभागाने ठरवलेल्या विषयावर देशवासीयांसाठी राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये तरुण पिढीला पोस्ट आणि फिलेटलीची ओळख होते. सर्जनशीलता, मौलिकता आणि आत्म-अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेत सहभागींना त्यांचे लेखन कौशल्य आणि प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होते. ही स्पर्धा ८ सप्टेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत आयोजित केली होती. ‘माझ्या आदर्श व्यक्तीला पत्र’ या विषयावर स्पर्धकांना इंग्रजी, हिंदी किंवा स्थानिक भाषेत पत्र लिहिण्याची संधी दिली होती. या स्पर्धेत १८ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी अंतर्देशीय पत्र श्रेणी व लिफाफा श्रेणी तसेच १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी अंतर्देशीय पत्र श्रेणी लिफाफा श्रेणी असे गट केले होते.
पत्रे मूल्यांकनासाठी संचालनालयाकडे जाणार
मंडळ स्तरावर निवडलेल्या प्रत्येक श्रेणीतील ३ विजेत्यांची पत्रे (एकूण १२) राष्ट्रीय स्तरावर पुढील मूल्यांकनासाठी संचालनालयाकडे पाठवली जातील.
मंडळ पातळीवर प्रत्येक श्रेणीतील पारितोषिके अशी
मंडळ पातळीवर प्रत्येक श्रेणीतील प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये, प्रत्येक श्रेणीतील द्वितीय पारितोषिक १० हजार रुपये, प्रत्येक श्रेणीतील तृतीय पारितोषिक ५ हजार रुपये देण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार ५० हजार रुपये, द्वितीय पुरस्कार २५ हजार रुपये व तृतीय पुरस्कार १० हजार रुपये असे पारितोषिक दिले जाणार आहे.