महामुंबईकरांसाठी खुशखबर! ‘जल मेट्रो’मुळे प्रवास वेगवान; १० मार्गांचा आराखडा अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 06:22 IST2026-02-14T06:22:05+5:302026-02-14T06:22:51+5:30
मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई आणि मीरा-भाईंदर परिसरातील जलमार्गांचा वापर करून प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याचा आराखडा आहे.

महामुंबईकरांसाठी खुशखबर! ‘जल मेट्रो’मुळे प्रवास वेगवान; १० मार्गांचा आराखडा अंतिम टप्प्यात
मुंबई - वाढत्या वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या महामुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात ‘जल मेट्रो’ सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही सल्लागार कंपनी १० नवीन जलमार्गांचा सविस्तर आराखडा सागरी मंडळाला सादर करणार असून, हा आराखडा आता अंतिम टप्प्यात आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी पर्याय म्हणून कोची जल मेट्रो
प्रकल्पाच्या धर्तीवर मुंबई महानगर क्षेत्रात ‘जल मेट्रो प्रकल्प’ सुरू करण्याची गरज होती. हे लक्षात घेऊन जलवाहतुकीला चालना देण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला. त्यानुसार आता फिजिबिलिटी अहवालाच्या आधारे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
ऑगस्ट २०२५ मध्ये सादर करण्यात आलेल्या अहवालात २१ ठिकाणांची निवड करण्यात आली असून, १० नवीन जलमार्ग प्रस्तावित आहेत. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई आणि मीरा-भाईंदर परिसरातील जलमार्गांचा वापर करून प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याचा आराखडा आहे.
सध्या २१ जलमार्गांवर जलवाहतूक सुरू
सध्या २१ जलमार्गांवर जलवाहतूक सुरू असून, ते जलमार्ग ८५ किमीचे आहेत. नवीन १० जलमार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास ८५ किमीचे जलमार्ग एकूण २०० किमीचे होतील. मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण आणि ठाणे याठिकाणी हे १० जलमार्ग असतील. या मार्गांवर लवकरच जल मेट्रो धावणार आहे. हे जलमार्ग कार्यान्वित झाल्यास मुंबई महानगर क्षेत्रासाठी लोकल, मेट्रो, सागरी सेतू, बेस्टसह जल मेट्रोचा पर्यायही उपलब्ध होणार आहे.
पर्यावरणपूरक आणि प्रभावी पर्याय
एमएमआरची लोकसंख्या २०३० पर्यंत ३ कोटींच्या पुढे जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना, रस्ते आणि रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी जल मेट्रो हा पर्यावरणपूरक आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो. सागरमाला योजना २.० अंतर्गत ६० टक्के केंद्र व ४० टक्के राज्य सरकारच्या निधीतून हा प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव आहे. सागरी मंडळाकडून सध्या २१ जलमार्गांवर जल वाहतूक चालवली जाते. एकूण ८५ किमीचे हे २१ जलमार्ग आहेत.
जल वाहतूक ही अतिजलद वाहतुकीचा एक पर्याय आहे. मुंबई महानगर क्षेत्राला मोठा समुद्र लाभला असून, सागरी मंडळाने आणखी नवीन १० जलमार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सविस्तर आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची लेखी माहिती सागरी मंडळाने खासदार रवींद्र वायकर यांना कळवली आहे. या जलमार्गांमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, अशी आशा वायकर यांनी व्यक्त केली.