कर्जाच्या नादात गमावले ११.५० कोटी, घाटकाेपरच्या व्यावसायिकाची फसवणूक; महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 11:35 IST2026-01-30T11:32:23+5:302026-01-30T11:35:10+5:30
Crime News: २०० कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून घाटकोपरच्या व्यावसायिकाची ११.५० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी व्यावसायिक हितेश अजमेरा (५२) यांच्या तक्रारीनुसार पंतनगर पोलिसांनी स्वतःला भोजपुरी अभिनेत्री असल्याचे भासवणाऱ्या महिलेसह ३ जणांविरोधात गुन्हा नोंदविला.

कर्जाच्या नादात गमावले ११.५० कोटी, घाटकाेपरच्या व्यावसायिकाची फसवणूक; महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
मुंबई - २०० कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून घाटकोपरच्या व्यावसायिकाची ११.५० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी व्यावसायिक हितेश अजमेरा (५२) यांच्या तक्रारीनुसार पंतनगर पोलिसांनी स्वतःला भोजपुरी अभिनेत्री असल्याचे भासवणाऱ्या महिलेसह ३ जणांविरोधात गुन्हा नोंदविला.
जानेवारी २०२४ मध्ये कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या माध्यमातून अजमेरा यांची शांतीलाल गोपाल पटेल याच्याशी ओळख झाली. गोव्यातील स्वतःच्या मालकीची ११० एकर जमीन विक्रीसाठी मदत करण्याची विनंती पटेल याने केली. त्यानिमित्ताने दोघांमध्ये संवाद सुरू झाला. दरम्यान, मार्च २०२४ मध्ये पटेल याने विवेककुमार उमेशकुमार सिन्हा उर्फ अभिषेककुमार सिंग चौहान आणि त्याची पत्नी आकांक्षा अवस्थी यांची ओळख अजमेरा यांच्याशी करून दिली.
आकांक्षा ही प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री असून मुंबईत चित्रपट स्टुडिओ असल्याचा दावा तिने केला. तसेच विवेक कमावलेले ३०० कोटी रुपये बिहारमधील चंपारण येथील एका गोदामात अडकून पडल्याचे सांगितले.
... अन् आरोपी फरार
मे आणि जुलै २०२४ मध्ये अजमेरा हे पटेल आणि विवेककुमार यांच्यासोबत बिहारला गेले. मात्र गोदाम दाखवण्याच्या बहाण्याने विवेककुमार अचानक गायब झाला. त्यानंतर आरोपींनी अचानक संपर्क तोडल्याने फसवणूक झाल्याचे अजमेरा यांच्या लक्षात आले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बिनव्याजी २०० काेटी देण्याचे आमिष
रक्कम मिळवण्यासाठी ११.५० कोटी रुपयांची आवश्यकता असून, त्या बदल्यात काही वर्षांसाठी २०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
बळी पडून अजमेरा यांनी मार्च ते जुलै २०२४ या कालावधीत टप्प्याटप्प्याने विवेककुमारच्या बँक खात्यात ११ कोटी ५० लाख रुपये ट्रान्सफर केले. याशिवाय गोदामातील रकमेबाबत केलेला करार दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.